व्याजमाफी योजनेचा लाभ एमएसएमई कर्जे, शिक्षणकर्जे, गृहकर्जे, ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी घेतलेली कर्जे, क्रेडिट कार्डाची थकित रक्कम, वाहनकर्जे, व्यावसायिकांनी घेतलेली वैयक्तिक कर्जे व वापरासाठी घेतलेली कर्जे यांना मिळणार आहे. सर्व प्रकारच्या वित्तसंस्थांनी या सर्व प्रकारच्या दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जांसाठी ही कर्जे घेणाऱ्या ऋणकोंना याचा लाभ मिळणार आहे. मात्र असे करताना संबंधित खाते २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत त्या वित्तसंस्थेने स्टॅण्डर्ड खाते या गटात टाकलेले असावे, असेही िरझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
करोना संकटात कर्जदारांना दिलासा देणाऱ्या केंद्र सरकारच्या व्याजमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग आज मंगळवारी मोकळा झाला आहे. ही योजना मान्य करत रिझर्व्ह बँकेने आज अध्यादेश जारी केला. ज्यात बँकांना या योजनेच्या अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत. चक्रवाढ व्याज माफीने जवळपास ७५ टक्के कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. तर यामुळे केंद्राच्या तिजोरीवर ६५०० ते ७००० कोटींचा अतिरिक्त भर येण्याची शक्यता आहे.
भारतीय स्टेट बँकेची या संपूर्ण योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार समितीकडून या योजनेची मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली होती. कर्जदारांना दिलासा देणारी ही योजना येत्या ५ नोव्हेंबर रोजी लागू होणार आहे. बॅंकांना तसेच वित्त संस्थांना चक्रवाढ व्याजाची माफ केलेली रक्कम ५ नोव्हेंबरपासून कर्जदाराच्या बँक खात्यात जमा करावी लागणार आहे. त्यानंतर या रकमेची बँकांना १२ डिसेंबरपर्यंत सरकारकडे मागणी करता येईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times