मुंबई: बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात दुर्गा विसर्जनाच्या वेळी झालेल्या पोलीस गोळीबाराच्या घटनेवरून शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडले आहे. ‘हाच गोंधळ, हिंसाचार व पोलिसी गोळीबार प. बंगाल, महाराष्ट्रात घडला असता तर ‘घंटा बजाव’छाप पोकळ हिंदुत्ववाद्यांनी नंगानाच घातला असता. मग आता मुंगेरमधील गोळीबारावर घंटाबाज हिंदुत्ववाद्यांची थोबाडे का आहेत? मुंगेरमध्ये हिंदूंचे रक्त सांडलेय. त्याविरोधात कधी घंटा बडवणार? निदान थाळ्या तरी वाजवा,’ अशी घणाघाती टीका शिवसेनेनं केली आहे.

मुंगेर जिल्ह्यात दुर्गा विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी गोळीबार केला. मूर्ती खेचून विसर्जन करायला लावले. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक ठार तर पंधरा लोक जखमी झाले. शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून या घटनेवर भाष्य करताना भाजपवर जोरदार शरसंधान केलं आहे. ‘महाराष्ट्र किंवा प. बंगालसारख्या राज्यात असे काही घडले असते तर भाजपवाल्यांनी हिंदुत्वावर हल्ला असल्याचे सांगून थयथयाट केला असता. राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली असती. गेला बाजार या गोळीबाराची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी भाजप शिष्टमंडळ राजभवनात चहापानास गेले असते. पण मुंगेरच्या रस्त्यावर भर मिरवणुकीत दुर्गा प्रतिमेची खेचाखेच पोलिसांनी केली. त्या खेचाखेचीत बेगडी हिंदुत्ववाद्यांची पीतांबरे अद्याप सुटली कशी नाहीत?,’ अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

वाचा:

‘महाराष्ट्रातील पालघरमध्ये ‘लॉक डाऊन’ काळात दोन साधूंची जमावाने हत्या केली, पण त्या हत्येने महाराष्ट्रातील साधुवाद, वगैरे सगळं संपलं. ‘सेक्युलर’ झाली अशी आवई उठवली गेली. काही वृत्तवाहिन्यांनी त्या दुर्दैवी साधूंची ढाल पुढे करून शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न निर्माण केले. आज मुंगेरला दुर्गापूजेवर पोलिसी गोळीबार होऊनही हे भुंकणारे व किंकाळ्या मारणारे थंडच आहेत. नितीशकुमारांचे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लावा, असा सूर बिहारातील भाजपवाल्यांनी काढलेला दिसत नाही. मुंगेरातील दुर्गा प्रतिमेचा अवमान व गोळीबार म्हणजे ‘जंगलराज’ आहे असं या ढोंगी डोमकावळ्यांना वाटू नये याचं आश्चर्य वाटतं,’ असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.

‘महाराष्ट्रात मंदिरे उघडण्यासाठी धमक्या देणाऱ्यांना मुंगेरचा हिंसाचार, हिंदुत्वाचा अवमान याबाबत काहीच घेणं-देणं पडलेलं दिसत नाही. सोयीचे हिंदुत्व हे असेच असते. मुंगेरातील हिंदुत्व रक्ताच्या थारोळ्यात पडले, पण हिंदुत्वाचे सर्व राजकीय ठेकेदार तोंडावरची मुखपट्टी डोळ्यांवर ओढून गप्प बसले आहेत. महाराष्ट्र, प. बंगालसारख्या राज्यांत हे असे काही दुर्दैवाने किंवा अपघाताने घडले की, यांचे हिंदुत्व दक्ष आणि सावधान होते. उत्तर प्रदेशात अबलांवर बलात्कार व खून झाले, साधू आणि पुजाऱ्यांना मंदिरातच निर्घृणपणे मारले गेले. हरयाणात एका मुलीला भररस्त्यात ठार केले. त्या प्रसंगास ‘लव्ह जिहाद’चे लेबल चिकटवून मोकळे झाले. भाजपशासित राज्यांत घडणाऱ्या या घटनांकडे बेगडी हिंदुत्ववादी अत्यंत संयमाने, तटस्थपणे पाहतात. ‘मुंगेर’सारखे हल्ले दडपले जातात, पण पालघरात सांडलेले साधूंचे रक्तही उसळत विचारते आहे, मुंगेरात हिंदूंचे रक्त सांडले. त्याविरोधात कधी घंटा बडवणार? निदान थाळ्या तरी वाजवा,’ असा घणाघात शिवसेनेनं केला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here