शारजा: आजचा दिवस गाजवला तो सनरायझर्स हैदराबादच्या संघाने. कारण या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत आरसीबीच्या फलंदाजांना १२० धावांवर रोखले. त्यानंतर हैदराबादच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत यावेळी आरसीबीवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह हैदराबादने दोन गुण कमावले आहेत. या दोन विजयांसह हैदराबादने आपले या स्पर्धेतील आव्हान कायम राखले असून प्ले-ऑफच्या दिशेने मोठे पाऊल टाकल्याचे पाहायला मिळाले.

आरसीबीने यावेळी सनरायझर्स हैदराबादपुढे १२१ धावांचे माफक आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार या षटकार लगावत दणक्यात सुरुवात केली. पण त्यानंतर मात्र वॉर्नरला जास्त धावा करता आल्या नाहीत. वॉर्नरला यावेळी आठ धावांवरच समाधान मानावे लागले.

वॉर्नर बाद झाल्यावर वृद्धिमान साहा आणि मनीष पांडे यांनी यावेळी चांगली भागीदारी रचली. साहा आणि पांडे यांनी यावेळी दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी रचली. पण यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात मनीष पांडेने आपील विकेट गमावली. मनीषने यावेळी १९ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २६ धावा केल्या. पांडे बाद झाला असला तरी वृद्धिमान साहा यावेळी चांगली फलंदाजी करत होता. पण खेळपट्टीवर अखेरपर्यंत टिकून राहणे त्याला जमले नाही. साहाने यावेळी ३२ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३९ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली.

साहा बाद झाल्यावर हैदराबादला यावेळी कमी कालावधीमध्येच दोन धक्के बसले. हैदराबादचा संघ यावेळी केन विल्यम्सनवर काहीसा अवलंबून होता. पण केनला यावेळी आठ धावाच करता आल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेला अभिषेष शर्मालाही आठ धावांवर समाधान मानावे लागले. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या जेसन होल्डरने मात्र धडाकेबाज फलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. होल्डरने यावेळी फक्त १० चेंडूंत १ चौकार आणि तीन षटकार लगावत नाबाद २६ धावांची तुफानी खेळी साकारली.

सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी यावेळी आरसीबीच्या फलंदाजांना आपल्या तालावर चांगलेच नाचवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच हैदराबादच्या संघाला आरसीबीच्या धावसंख्येला वेसण घालता आले. हैदरबादच्या गोलंदाजांनी यावेळी टिच्चून मारा केला. त्यामुळे आरसीबीला या सामन्यात हैदराबादपुढे १२१ धावांचे माफक आव्हान ठेवता आले. हैदराबादच्या संदीप शर्माने यावेळी चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले. संदीपने यावेळी चार षटकांत २० धावा देत दोन फलंदाजांना बाद केले. हैदराबादच्या टी. नटराजन आणि रशिद खान यांनीही यावेळी अचूक मारा करत आरसीबीच्या फलंदजांना जास्त धावा करू दिल्या नाहीत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here