काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यानंतर आता तिथं जमीन खरेदी करण्यास मुभा देण्याचा आदेश केंद्र सरकारनं काढला आहे. मात्र, हा आदेश निघत असतानाच दुसरीकडे श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवल्याबद्दल काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ‘सामना’तील एका लेखातून त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘काश्मीरमध्ये ३७० कलम हटवल्यावर परिस्थिती सुरळीत होईल. कश्मीर खोऱ्यातील ४० हजार काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरी सहज जाता येईल असा ‘प्रपोगंडा’ केला गेला. तो चुकीचा आहे. एकही कश्मिरी पंडित अद्याप कश्मीर खोऱ्यात परतू शकला नाही. उलट तेथील लोकांवर, राजकीय हालचालींवर कडक निर्बंध लादले. आजही काश्मीरात लष्कराच्या बंदुकांमुळेच शांतता आहे,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.
वाचा:
‘काश्मीरप्रश्नी पंडित नेहरू किंवा तेव्हाच्या राज्यकर्त्यांच्या भूमिका लेच्यापेच्या होत्या हा आरोप, अपप्रचार तितकासा खरा नाही. इतिहास सोयीनुसार मांडण्याची परंपरा आता सुरू झाली आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी व शांतता राखण्यासाठी त्यांच्या परीने प्रयोग केले. असे ‘प्रयोग’ अटलबिहारी वाजपेयी यांनीही केले. लाहोरला ते बस घेऊन गेले. मुशर्रफबरोबर आग्रा येथे परिषद घेतली. हा प्रयोगच होता. मोदी-शहा यांनी मेहबुबा मुफ्तींबरोबर भाजपचे सरकार जम्मू-कश्मीरमध्ये बनवले. ते कशासाठी? याकडेही एक शांतता राखण्याचा ‘प्रयोग’ म्हणूनच पाहायला हवे,’ असा टोलाही राऊत यांनी हाणला आहे.
वाचा:
‘मेहबुबा मुफ्ती व त्यांचा पक्ष सरळ आझाद काश्मीरच्या बाजूने आहे. जोपर्यंत ३७० कलम काश्मीरात पुन्हा लावले जात नाही तोपर्यंत काश्मीरात तिरंगा फडकवू दिला जाणार नाही, अशी बेताल भाषा मेहबुबांनी केली आहे. फारुख अब्दुल्ला यांनी तर हिंदुस्थानच्या विरोधात चीनची मदत घ्यायची भाषा केली. हा अतिरेक आहे. याचा अर्थ ३७० कलम गेल्यानंतरही काश्मीरचा प्रश्न संपलेला नाही. आता जमिनी खरेदी करण्याचा आदेश निघाला आहे. जमिनी खरेदी करायच्या, पण त्या जमिनीवर आमचा तिरंगा फडकवता येत नसेल तर त्या जमिनीच्या तुकड्यांचा उपयोग काय?,’ असा प्रश्न राऊत यांनी केंद्र सरकारला केला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times