अहमदनगर: साईबाबा जन्मभूमी वादाबाबत शिर्डीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. रविवारची सुट्टी असल्यामुळे भाविकांची साई दर्शनासाठी शिर्डीत मोठी गर्दी झाली आहे. मात्र, बाजारपेठ बंद असल्यामुळं साईभक्तांची मोठी गैरसोय झाली. शिर्डी शहरात ग्रामस्थ व साईभक्तांनी रॅली काढली.

साईबाबा जन्मस्थळाच्या वादातून आजपासून बेमुदत पुकारण्यात आला. शनिवारी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी एकमताने हा निर्णय घेतला होता. या बंदला आज चांगला प्रतिसाद मिळाला असून शिर्डीतील सर्व दुकाने, व्यवहार बंद आहेत.

शिर्डीत आज सकाळी द्वारकामाईसमोर सर्वधर्म सद्भावना परिक्रमा रॅली देखील काढण्यात आली. या रॅलीची सुरवात ‘शिर्डी माझे पंढरपूर’ आरती करून करण्यात आली. यावेळी शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ‘ओम साई नमो नम: ‘ चा जयजयकार करीत पालखी मार्गाने परीक्रमा शहरात काढण्यात आली. साईचरित्रातील ओव्यांचे फलक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. यावेळी सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पाथरी येथे साईबाबांचा जन्म झाला असा दावा स्थानिकांनी केला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना काही लोकांनी साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केली. त्यावर साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच्या विकासासाठी राज्य सरकारने विकास आराखडा तयार केला असून त्याचे भूमिपूजन लवकरच केले जाईल अशी घोषणा त्यांनी केली. त्यानंतर शिर्डी ग्रामस्थही आक्रमक झाले. साईबाबांचा जन्म, धर्म याबाबत साईचरित्रात स्पष्ट लिहलेले असतानाही अनेक ठिकाणी साईबाबांच्या जन्मस्थानाचे दावे केले जात असून, त्यातून साईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या विचारालाच नख लावण्याचा प्रयत्न होत आहे. काही लोकांनी तर साईबाबांना विशिष्ट धर्मात अडकवण्याचा प्रयत्न केला असून तो निंदनीय असल्याची भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here