अहमदनगर: करोनाच्या संकटानंतर येणारी दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिकांमध्ये अद्याप फारसा उत्साह दिसून येत नाही. असे असले तरी तालुक्याच्या पश्चिम भागात मात्र दररोज रात्री फटाक्यांचे धमाके सुरू आहेत. दिवाळी आधीच होणारे हे फटाक्यांचे बार आनंदाने नव्हे तर स्वत:च्या बचावासाठी करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. या भागातील बिबट्याला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे त्याला पळवून लावण्यासाठी वन विभागानेच ही युक्ती शोधली असून त्यासाठी वाड्या-वस्त्यांवर फटक्यांचे वाटपही केले आहे.

पाथर्डी तालुक्यातील नगरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी तीन दिवसांपासून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नगर जिल्ह्यासह राज्यातील वनविभागाच्या अनुभवी पथकांना यासाठी पाचारण करण्यात आले आहे. नगरचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी स्वत: या भागात तळ ठोकून मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत. मात्र, बिबट्याला पकडण्यात यश आलेले नाही. आतापर्यंत बिबट्याने तीन बालकांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. ही मोहीम सुरू झाल्यानंतरही पाथर्डी शहराजवळ एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बिबट्या या भागातच असल्याचा वनविभागाचा अंदाज आहे. या भागात गर्भगिरीची डोंगर रांग आहे. त्यात वाढलेले जंगल, शेजारीच शेतातील पिके आणि त्यातच वसलेल्या वाड्या-वस्त्या असा हा भाग आहे.

वाचा:

डोंगर-दऱ्या आणि शेते पिंजून काढूनही तो सापडत नसल्याने त्याच्यापासून बचावाचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यासाठी वन विभागाने या भागातील वाड्या-वस्त्यांवर दोनशे बॉक्स फटाके वाटले आहेत. दररोज सायंकाळी आणि रात्री ग्रामस्थ वस्तीजवळ, गावाजवळ फटाके फोडत आहेत. त्याच्या आवाजाने जवळपास असलेला बिबट्या पळून जावा, अशी ही युक्ती आहे.

वाचा:

दुसरीकडे त्याला पकडण्यासाठीही वनविभागाची मोहीम सुरूच आहे. राज्यातून आलेली पथके कसून शोध घेत आहेत. २२ ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. ठिकठिकाणी कॅमेरे लावून बिबट्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, यापैकी कोणत्याही प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. दिलासा एवढाच की मोहीम सुरू झाल्यापासून किमान बिबट्याने माणसांवर हल्ला केल्याची घटना घडली नाही.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here