इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या आत्महत्या प्रकरणात गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अटकेदरम्यान पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप अर्णब यांनी केला होता. तसंच, आपल्या कुटुंबातील सदस्य व मुलालाही मारहाण केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. हाच धागा पकडत राम कदम यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.
राज्यपालांच्या भेटीत राम कदम यांनी अर्णब गोस्वामी यांना मारणार करणाऱ्या त्या ९ पोलिसांवर त्वरित कारवाई करून त्यांचं निलंबन करा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच, या प्रकरणाची सखोल चौकशीही करण्यात यावी असंही त्यांना राज्यपालांच्या कानावर घातलं आहे. शिवाय, पोलिसांविषयी आदर आहेच पण मारहाणीचं समर्थन होऊ शकत नाही, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे.
याच प्रकरणात राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहलं आहे. अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या राहत्या घरातून रायगड पोलिसांनी अटक केली, या अटकेवेळी नियमांचे उल्लंघन करून पोलिसांनी गोस्वामींना मारहाण केली. त्याचं समर्थन देशातील कोणताही नागरिक करु शकत नाही. या ९ पोलिसांना निलंबित करुन उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
महाराष्ट्राला आणीबाणीच्या दिशेनं नेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गोस्वामींसह देशाची माफी मागावी आणि तात्काळ अर्णब गोस्वामींची सुटका करायला हवी, असंही राम कदम यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, पोलिसांच्या कारवाईदरम्यान अर्णब यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना विरोध करण्यात आला. कारवाईवर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळेच अर्णब यांच्याविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अर्णब यांना अटक करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात अर्णब हे पोलिसांशी हुज्जत घालताना व अटकेस मनाई करताना दिसत आहेत. त्यात एका महिला पोलिसाचाही आवाज ऐकू येत आहे. त्यात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना एक तास घराबाहेर उभे करण्यात आले होते, असा उल्लेख आढळतो.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times