भाजपच्या पक्ष कार्यालयात आज भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीसाठी माजी मंत्री शिंदे हे नगरला आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. ‘राज्यातील सरकारला एक वर्ष होत आहे. या एक वर्षात सरकारने नेमके काय केले ? हे त्यांनी जाहीर करावे,’ असे आवाहन शिंदे यांनी राज्य सरकारला दिले. ते पुढे म्हणाले, ‘राज्य सरकार सातत्याने सांगत आहे की केंद्राने काय केले ? पण केंद्र सरकारने यांना जे दिलं हे या सरकारने नीट वाटले सुद्धा नाही. हे सरकार लोकांच्या हिताचे काही काम करत नाही. हे सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील नसून जनतेविरोधी आहे. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही. लवकरच या सरकारचा कार्यक्रम होईल. सरकारमधील तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात अंतर्गत धुसमत असून केवळ हे पक्ष सध्या एकमेकाला सावरण्याची भूमिका घेत आहे. राज्यातील हे सरकार कधी जाईल ? कितपत टिकेल ? असे प्रश्न सामान्य लोकसुद्धा विचारतात. कारण लोकांना सरकारकडून जी मदत पाहिजे, ती मिळताना दिसत नाही. अर्णव गोस्वामी, कंगना सारख्या प्रश्नावर हे सरकार लक्ष देत आहे. यापेक्षा मोठे प्रश्न राज्यात आहेत. मात्र त्याकडे सरकार लक्ष देत नाही, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे हे सरकार गेल्याशिवाय महाराष्ट्राला चैन पडणार नाही, सुख मिळणार नाही,’ असेही ते म्हणाले.
वाचा:
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नगर जिल्ह्यातील भाजपमधील अनेक जण राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत,’ असे वक्तव्य केले होते. याबाबत शिंदे यांना विचारले असता, ‘त्यांचे हे स्वप्न लवकरच धुळीस मिळेल,’ असा टोला त्यांनी तनपुरे यांना लगावला.
जनतेने आम्हाला बहुमत दिले
‘राज्यातील सरकार पाच वर्षाचा काळ पूर्ण करेल, असे जनतेलाच वाटत नाही,’ असे सांगतानाच माजी मंत्री शिंदे पुढे म्हणाले, ‘राज्यामध्ये आमच्या विधानसभेला १०५ जागा निवडून आल्या आहेत. जनतेने आम्हाला बहुमत दिले. पण अशा परिस्थितीत एक वेगळे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या विरोधात झाले आहे. राज्य सरकार हे जनतेच्या विरोधात काम करीत असल्यामुळे ते फार काळ टिकणार नाही.’
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times