अलिबाग: इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात काल, बुधवारी अटक करण्यात आलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक यांनी अलिबागमधील एका शाळेत उभारलेल्या तात्पुरत्या तुरुंगात रात्र काढली. अलिबागमधील न्यायालयाने गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींना १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची रवानगी या तात्पुरत्या तुरुंगात करण्यात आली होती.

पोलिसांनी गोस्वामी यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. मात्र, पोलीस कोठडीची आवश्यकता नाही असे सांगून ही विनंती फेटाळली होती. एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, अर्णब गोस्वामी यांना वैद्यकीय तपासणीसाठी बुधवारी रात्री सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत नेण्यात आले. या शाळेत तात्पुरते तुरुंग उभारण्यात आले आहे. येथील कोठडीत त्यांनी रात्र काढली.

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी अर्णब गोस्वामी आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बुधवारी अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती.

अन्वय नाईक यांच्या ‘सुसाइड नोट’मध्ये काय?

अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने अलिबागमधील कावीर येथील त्यांच्या बंगल्यात दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे सारडा या तिघांनी एकूण ५ कोटी ४० लाख रुपये थकवल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे अन्वय नाईक यांनी सुसाइड नोटमध्ये नमूद केले होते. या प्रकरणी पोलिसांनी सुसाइड नोटच्या आधारे तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here