कोलकाताः पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस (TMC) आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये राजकारण तीव्र झालं आहे. अशा वातावरणात बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी तृणमूल कॉंग्रेस नेत्यांना उघडपणे धमकी दिली आहे. ”उपद्रव निर्माण करणार्‍या ममता दीदींच्या माणसांनी स्वत:ला ६ महिन्यांत सुधारावं अन्यथा हात, डोके आणि बरगड्या तुटतील. घरी जाण्यापूर्वी तुम्हाला रुग्णालयात जावं लागेल’, असं दिलीप घोष म्हणाले. ‘त्यांनी जर आणखी उपद्रव केला तर स्मशानभूमीत पाठवलं जाईल’, अशी धमकी त्यांनी दिली.

पश्चिम बंगालच्या प्रमुखांच्या या वक्तव्यामुळे राज्याचं राजकारण तापलं आहे. गेल्या काही महिन्यांत भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसच्या समर्थकांमध्ये झटापटीच्या अनेक घटना घडल्या आहेत. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा बळी गेला आहे. गेल्या महिन्यात वर्धमान जिल्ह्यात दिलीप घोष यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. त्यांनी तृणमूल कॉंग्रेस समर्थकांवर आरोप केले. मात्र, टीएमसीने त्यांचे आरोप पूर्णपणे खोडून काढले.

बनावट ट्विटवरून वाद

यापूर्वी बनावट ट्विटच्या एका प्रकरणात दिलीप घोष यांनी तृणमूल कॉंग्रेसचे खासदार काकोली घोष दस्तीदार यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. काकोली यांनी त्यांचं वक्तव्य विकृत करून ते ट्विट केलं होतं, असं त्यांनी म्हटलं होतं. या प्रकरणात घोष यांनी आपल्या वकिलाला तृणमूलच्या खासदाराविरूद्ध मानहानीची कायदेशीर कारवाई करण्यास सांगितलं आहे.

अमित शहांचा तीन दिवसांपूर्वी बंगालमध्ये दौरा

पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची जोमात तयारी सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंगालमधील आदिवासी भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी मटुआ समाजातील कुटुंबीयांकडे जेवणही केलं. या काळात शहा यांनी अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here