एसटीच्या जळगाव आगारात वाहक म्हणून सेवेत असलेल्या मनोज अनिल चौधरी या ३० वर्षीय वाहकाने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पगार थकल्याने हा वाहक आर्थिक कोंडीत सापडला होता. त्यातूनच त्याने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. तसंच, सुसाइड नोटमध्ये आत्महत्येस ठाकरे सरकार व एसटी प्रशासन जबाबदार असल्याचं नमूद केलं होते. या घटनेनंतर सरकारने तातडीने एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराबात निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येत आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच भूमिका होती त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. आज उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक झाली. आणि यावर मार्ग काढण्यात आला आहे. शासनाकडून एसटीसाठी पुढील सहा महिन्यासाठी आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे, असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे.
टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतुक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली. आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल. शासनाकडून ही आता आर्थिक मदत मिळाल्याने एसटीच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times