‘बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला संघटनात्मक बांधणीचा फायदा झाला. पाच वर्षांत तेथील सरकारनं केलेल्या कामाचीही मदत झाली. त्याचं प्रतिबिंब निकालात पडलं आहे,’ असं बावनकुळे यांनी सांगितलं. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये प्रचाराची धुरा ज्या पद्धतीनं सांभाळली, त्याचं हे यश आहे,’ असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ‘पंतप्रधान मोदी यांची दूरदृष्टी, केंद्र सरकारच्या कामाचाही बिहार निवडणुकीत फायदा झाला,’ असं बावनकुळे म्हणाले. ते ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
वाचा:
बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराची धुरा भाजपनं महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. करोना संसर्गाचा काळ असल्यानं फडणवीस यांनी सुरुवातीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहार भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी काही दिवस बिहारचा दौराही केला होता. मात्र, करोनाची लागण झाल्यानं ऐन प्रचाराच्या काळात त्यांना बिहारमध्ये जाता आले नव्हते.
वाचा:
आतापर्यंत हाती आलेले कल पाहता, भाजपला सर्वाधिक ७७ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला ६५ जागा मिळताना दिसत आहेत. नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर, लोकजनशक्ती पक्षाला अवघ्या दोन जागांवर आघाडी दिसत आहे. काँग्रेसचा २० चा आकडा पार करेल की नाही अशी स्थिती आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times