आरजेडीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत नितीशकुमारांवर गंभीर आरोप केलेत. निवडणुकीत महागठबंधनच्या उमेदवारांचा ११९ जागांवर विजय झाला आहे. रिटर्निंग अधिकाऱ्यांनी विजयाबद्दल उमेदवारांचं अभिनंदनही केलंय. पण आता त्यांना प्रमाणपत्र देण्यास नकार देत आहेत आणि तुमचा पराभव झाल्याचं सांगत आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरही उमेदवार विजयी झाल्याचं दाखवत आहेत. यामुळे लोकशाहीत अशी लूट चालणार आहे, असं आरजेडीने म्हटलं आहे.
आरजेडीने दोन ट्विट केलेत. दुसऱ्या ट्विटमध्ये संयुक्त जनता दलाचे नेते आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर आरजेडीने आरोप केला आहे. निवडणुकीत महागठबंधनच्या ११९ उमेदवारांचा विजय झाला आहे. पण वृत्तवाहिन्यांवर १०९ उमेदवर विजयी झाल्याचं दाखवलं जात आहे. नितीशकुमार हे अधिकाऱ्यांना फोन करून मतमोजणी फेरफार करत आहेत. अंतिम निकाल लागल्यावर आणि विजयाच्या शुभेच्छा दिल्यावर अधिकरी आता तुम्ही पराभूत झाल्याचं सांगत आहेत. मतमोजणीत मोठा घोळ सुरू आहे, असा गंभीर आरोप आरजेडीने केला आहे.
नितीशकुमार हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून कठोर निर्देश जारी करत आहेत. महागठबंधनला काहीही करून १०५ ते ११० जागांवर रोखण्यास सांगण्यात येत आहे. लोकशाहीत ही लूट चालणार नाही. जवळपास १० जागांवर नितीशकुमार प्रशासन मतमोजणीत जाणूनबुजून दिरंगाई करत आहे. विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जात नाहीए. मुख्यमंत्री कार्यालयात बैठक घेऊन नितीशकुमार आणि सुशील मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रधानसचिवांमार्फत जिल्हाधिकारी आणि रिटर्निंग अधिकाऱ्यांना फोन करत आहेत. मतांचे कमी अंतर असलेल्या जागांवर आपल्या बाजूने निर्णय घेण्यास दबाव टाकत आहेत, असे आरोप आरजेडीने केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times