वाचा:
गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपुरात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद केली जात आहे. चंद्रपुरातील थंडी वाढली असल्याचे जाणवत असले तरीसुद्धा या तापमानाच्या नोंदीवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. चंद्रपुरात प्रादेशिक हवामान खात्याची स्वतंत्र वेधशाळा आहे. तसेच या वेधशाळेपासून ८०० मीटर अंतरावर हवामान खाते आणि भारतीय कृषी संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यामाने स्थापन करण्यात आलेली अन्य एक वेधशाळा आहे. या वेधशाळेतील मोजमाप यंत्रणा स्वयंचलित आहे. हवामान खात्याच्या स्वतंत्र वेधशाळेनुसार मंगळवारी चंद्रपुरात ८.२ अंश सेल्सिअस तर हवामान खाते आणि भारतीय कृषी संशोधन परिषद यांच्या वेधशाळेनुसार १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे. तरीही सरकार दरबारी हवामान खात्याची यंत्रणा अधिकृत असल्याने चंद्रपुरातील मंगळवारचे तापमान ८.२ अंश सेल्सिअसच असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
वाचा:
दरम्यान, चंद्रपूर खालोखाल यवतमाळात ९.५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील हे दुसऱ्या क्रमांकाचे नीचांकी तापमान होते. नागपुरातही पारा ११.५ पर्यंत घसरला आहे. इथून पुढेही विदर्भातील वातावरणात गारवाच राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यात बुधवारनंतर शहरात किंचित ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान काही अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
हवामान खात्याची यंत्रणा सदोष
चंद्रपुरातील हवामान खात्याची यंत्रणा सदोष असून वेधशाळेची जागाही चुकीची आहे. याबाबत अनेकदा केंद्र सरकारकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. एकाच शहरात अवघ्या ८०० मीटर अंतरावर असलेल्या दोन वेधशाळांमधील मोजमापात चक्क ४ अंशांची तफावत असणे आश्चर्यजनक आहे. हवामान खात्याची यंत्रणा सदोष आहे यासाठी हा पुरावा पुरेसा आहे. त्यात लवकरात लवकर योग्य त्या सुधारणा होणे अपेक्षित आहे, असे मत हवामान तज्ज्ञ सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times