वाचा:
महाराष्ट्रात दिवाळीनंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सराकरने घेतला आहे. त्यासाठी ५० टक्के उपस्थिती हे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिक्षक व शाळांतील अन्य कर्मचाऱ्यांची प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून लगेचच आणि प्रशासनाला पत्र लिहिण्यात आले. शिक्षकांसह शाळांतील सर्व कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा द्या, अशी विनंती करणारे हे पत्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन सचिव यांनी ६ नोव्हेंबर रोजी लिहिले होते. याबाबत एक ट्वीट करून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही माहिती दिली होती. मात्र, सरकारचं पत्र उशिरा मिळाल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आल्याने त्यावरून पुन्हा एकदा खटके उडाले होते. केंद्र सरकारच्या अखत्यारितील रेल्वेकडून सातत्याने राज्य सरकारची अडवणूक केली जात असल्याचेही बोलले जात होते. या सगळ्या वादाला आज पूर्णविराम मिळाला आहे.
वाचा:
राज्य सरकारच्या विनंतीवरून ११ नोव्हेंबर रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून याबाबत रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला आज मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार सध्या उपनगरीय मार्गांवर धावत असलेल्या विशेष लोकलगाड्यांमधून प्रवास करण्याची मुभा मुंबई महानगर क्षेत्रात राहणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
सर्वांसाठी लोकल कधी?
शिक्षकांबाबत राज्य सरकारने दिलेला प्रस्ताव मंजूर झाला असला तरी सर्वांसाठी लोकल कधी सुरू होणार, या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप रेल्वेकडून मिळालेले नाही. शिक्षकांच्या प्रस्तावाआधीच राज्याकडून सर्वांसाठी लोकल सुरू करण्याची विनंती रेल्वेला करण्यात आलेली आहे. यावर रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच सांगितले होते. मात्र, या प्रस्तावाची सद्यस्थिती काय, हे अद्याप कळू शकलेले नाही. सर्वांसाठी लोकल सुरू होत नसल्याने लाखो नोकरदारांची अजूनही कोंडी होत आहे. दूर उपनगरांत राहणाऱ्या प्रवाशांना कार्यालय गाठण्यासाठी चार-चार तास दररोज प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या निर्णयाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times