जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर खाली आणतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सोमवारी मंदीचा फटका साऱ्या जगाला बसत असल्याचे अधोरेखित केले. त्याचवेळी भारतासारख्या अर्थव्यवस्था देत असलेल्या नकारात्मक धक्क्यामुळे मंदीचे सावट अधिकच प्रकर्षाने जाणवत असल्याचे नाणेनिधीने म्हटले आहे. येथे ५०वी जागतिक आर्थिक परिषद आज, मंगळवारपासून सुरू होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने घसरत्या विकासदराकडे लक्ष वेधले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते, जागतिक विकासदर चालू आर्थिक वर्षात (२०१९-२०) २.९ टक्के राहील. २०२०-२१मध्ये हा विकासदर किंचित वाढून ३.३ टक्के तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात तो ३.४ टक्के होईल. ही घसरण नाणेनिधीने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये व्यक्त केलेल्या अंदाजांच्या तुलनेत आहे.
भारताचीही घसरण
भारतात जन्मलेल्या व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ असलेल्या गीता गोपिनाथ यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील ग्रामीण उत्पन्नाची मंदावलेली वाढ तसेच बिगरबँक वित्तक्षेत्रात असलेला आर्थिक ताण याचा परिणाम होऊन भारतीय अर्थव्यवस्था कूर्मगतीने मार्गक्रमण करत आहे. जागतिक आर्थिक दृष्टिकोन स्पष्ट करताना गोपिनाथ यांनी भारताचा विकासदर घसरून चालू आर्थिक वर्षात (२०१९-२०) ४.८ टक्के राहील, असे नमूद केले आहे. या विकासदरामध्ये २०२०-२१ मध्ये वाढून ५.८ टक्के होईल, तर २०२१-२२ मध्ये तो ६.५ टक्के राहील.
जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती
आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा होणे कठीण आहे. अर्जेंटिना, इराण व तुर्कस्तान या देशांच्या अर्थव्यवस्था सर्वाधिक तणावातून जात आहेत. यांच्याप्रमाणे ब्राझील, भारत आणि मेक्सिको या देशांच्या अर्थव्यवस्थांवरही ताण आहे.
सकारात्मक बाजूचा विचार केल्यास, जागतिक स्तरावर औद्योगिक उत्पादनामध्ये थोडी सुधारणा झाली आहे. अमेरिका व चीन यांच्यातील व्यापारी संबंधांमध्ये थोडी सुधारणा दिसत आहे. नोडिल ब्रेग्झिटची भीतीही कमी झाली आहे. असे असले तरी जागतिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आखण्याची गरज असल्याचे गीता गोपिनाथ म्हणाल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times