मुंबईः वडनेराचे आमदार रवी राणा यांच्या अटकेवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारचा निषेधही व्यक्त केला आहे.

आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली काल रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यावरुनच फडणवीस यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ‘शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळी दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो,’ असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

‘दीपोत्सवाचे पर्व साजरे होत असताना आपला बळीराजा मात्र मदतीविना संकटात आहे. त्याची दिवाळी या सरकारने अंधारातच ठेवली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, संत्र्याचे प्रचंड नुकसान झाले. बोंडअळीने कपाशी संपविली. मराठवाडा, विदर्भ आणि इतरही सर्व भागात हीच अवस्था! पण मदत द्यायला सरकार तयार नाही,’ असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

वाचाः

‘बळीराजा संकटात असताना त्याची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी सरकारकडे मागण्या करण्यात आल्या, सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पण सरकार दाद द्यायलाच तयार नाही. बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहताना भाजपाने अनेक ठिकाणी बेसन-भाकर आंदोलन केले,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अतिवृष्टीमुळं पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, या मागणीसाठी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतंय. रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल २ तास महामार्गही रोखून ठेवला होता. त्यामुळं पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढत रवी राणा यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here