भंडारा: दिवाळीत परंपरेनुसार शेळ्यामेंढ्यांच्या आंघोळीसाठी गावानजीकच्या तलावात उतरले असता, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तीन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडाऱ्यातील तालुक्यात येथे घडली.

पुयार येथे आज, शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. मधुकर नीलकंठ मेश्राम (वय ४२), सुधाकर मेश्राम (वय ३९) आणि प्रदीप मेश्राम अशी मृतांची नावे आहेत. दिवाळीत परंपरेनुसार शेळ्यामेंढ्यांना आंघोळ घालण्यासाठी ते तलावावर गेले होते. अंदाजे शंभर शेळ्या-मेंढ्या घेऊन ते गावाजवळील तलावावर पोहोचले. मधुकर हा शेळ्या-मेंढ्यांना घेऊन आंघोळ घालण्यासाठी खोल पाण्यात उतरला. काही वेळाने शेळ्या-मेंढ्या पाण्याबाहेर जात होत्या. मात्र, मधुकर हा बुडू लागला. ते पाहून सुधाकरने पाण्यात उडी मारली. पाण्याचा अंदाज न आल्याने तो देखील बुडू लागला. त्यानंतर प्रदीपनेही त्यांना वाचवण्यासाठी तलावात उडी मारली. दुर्दैवाने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती एका मुलाने कुटुंबीयांना दिली. गावात ही घटना घडल्याचे समजताच, गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली. काही ग्रामस्थांच्या मदतीने तलावातून तिघांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर लाखांदूर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक चहांदे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले. ऐन दिवाळीत मेश्राम कुटुंबीयांसह संपूर्ण पुयार गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here