लॉकडाऊननंतर राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करण्यात यांवी यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा हाती घेतला होता. यासाठी संपूर्ण राज्यात घंटानाद आंदोलनही छेडलं होतं. मात्र, सरकारकडून सुरक्षेततेच्या कारणास्तव मंदिर उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. आज, अखेर सरकारने मंदिरांबाबत निर्णय घेतला असून पाडव्याच्या दिवशी राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही ९ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
‘ मंदिरे उघडण्याचा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. केवळ अंहकारातूनच हा निर्णय रखडवला गेला. सरकारनं हा निर्णय आधीच घ्यायला पाहिजे होता. पुजारी, वारकरी आणि आंदोलकांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभा आहे, याच अहंकारातून त्यांना मदत करायची नाही, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे.
पाडव्यापासून मंदिरे सुरु होणार
पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे. करोनाकाळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times