बिहारमध्ये सत्ताधारी एनडीएची रविवारी बैठक झाली. यामध्ये नितीशकुमार यांची एकमताने बिहारमधील एनडीएच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. तर तारकीशोर प्रसाद यांची रविवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. तर उपनेतेपदी रेणु देवी यांची निवड झाली. यामुळे सुशीलकुमार मोदींऐवजी आता तारकिशोर प्रसाद हे असतील, असं बोललं जातंय. पण रेणु देवी याही उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. तर बिहारला दोन उपमुख्यमंत्री असतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपने मात्र अद्याप उपमुख्यमंत्रीपदाबाबत काहीही स्पष्ट केलेलं नाही. तारकिशोर प्रसाद हे वैश्य समाजाचे, तर रेणु देवी या मागास समाजाच्या प्रतिनिधी आहेत. दुसरीकडे तारकिशोर प्रसाद यांचं सुशीलकुमार मोदींनी अभिनंदन केलं. भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवडल झाल्याबद्दल तारकिशोर प्रसाद यांचं अभिनंदन, असं ट्विट सुशीलकुमार मोदींनी केलं. तारकिशोर प्रसाद हे सुशीलकुमार मोदींचे निकटवर्तीय मानले जातात.
यामुळे सुशीलकुमार मोदी हे आता बिहारचे उपमुख्यमंत्री होणार नाहीत, हे स्पष्ट झालं आहे. उपमुख्यमंत्रीपदी कोणाची नेमणूक होईल? यावर दुपारपर्यंत कुठलीही स्पष्ट नव्हती. पण पुढील उपमुख्यमंत्री कोण असेल हे लवकरच कळेल, असं नीतीश कुमार म्हणाले होते.
सुशीलकुमार मोदींची नाराजी उघड
तारकिशोर प्रसाद यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होताच सुशीलकुमार मोदींनी ट्विट केलं. ‘भाजप आणि संघ परिवाराने ४० वर्षांच्या राजकीय जीवनात आपल्याला इतकं दिलंय की दुसर्या कुणालाही भेटलं नसेल. या पुढील जबाबदारीही प्रामाणिकपणे पार पाडेन. कार्यकर्त्याचे पद मात्र कोणीही काढून घेऊ शकत नाही’, असं म्हणत उपमुख्यमंत्रीपदावरून हटवल्याने सुशीलकुमार मोदींची नाराजी उघड झाली.
भाजप नेते गिरीराज सिंह यांनी तारकिशोर प्रसाद यांचं अभिनंदन केलं. तारकीशोरजी आपली आज विधिमंडळ पक्षाच्या नेत्यापदी एकमताने निवड झाली आहे. तुम्ही सर्वांनासोबत घेऊन पुढे जाल. हा विश्वास आहे, असं गिरीराज सिंह म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times