विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपनं हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत शिवसेनेला घेरलं होतं. त्यानंतर शिवसेनेनं भाजपच्या या आरोपांचं वेळोवेळी खंडन केलं होतं. आजही पत्रकारांनी संजय राऊत यांना या मुद्द्यावर प्रश्न विचारला असता, त्यांनी आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू असं सांगत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
‘आजही देशाचं राजकारण ५५ वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी बेरोजगारी, भूमीपुत्रांचा मुद्दा मांडला त्यावरच केंद्रीत आहे. बिहार निवडणुकीत पाहिलं असेल तर या दोन मुद्द्यांवर निवडणूका लढल्या गेल्या. महाराष्ट्रात बाळासाहेबांनी ५५ वर्षांपूर्वी ठिगणी टाकली होती. प्रत्येक राज्यात भूमीपत्रांचा विषय राजकारणात महत्त्वाचा ठरतोय,’ असं संजय राऊत म्हणाले आहेत.
आमच्या हिंदुत्वाला प्रमाणपत्राची गरज नाहीये
‘आमचं हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू. आम्हाला तुमच्याकडून प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही कधीच हिंदुत्वाचं राजकारण करत नाही. देशात जिथे कुठे गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहिल,’ असा घणाघात राऊत यांनी केला आहे.
‘आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिवसेनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रुपाने अभिवादन करण्यासाठी आले आहेत. आजच्या दिवशी शिवसेनाप्रमुखांना आम्ही फक्त देहानं निरोप दिला पण त्यांचे विचार, हिंदुत्व, मराठी बाणा हे सगळं आमच्यासोबत कायमस्वरुपी आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हा वारसा पुढे नेऊ,’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times