वाचा:
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई जिंकण्याचा संकल्प केला आहे. शिवसेनेवर सातत्याने हल्ले करणारे आमदार अतुल भातखळकर यांच्यावर त्यासाठी मोठी जबाबदारीही देण्यात आली आहे. त्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेने वेळ न दवडता भाजपच्या निर्धाराची जोरदार खिल्ली उडवली आहे. ‘भाजपला मुंबईतल्या आर्थिक उलाढालींमध्ये, येथल्या शेअर बाजारात, जमिनींत रस आहे. मुंबईला दिल्लीचं पायपुसणं बनवण्याचा त्यांचा इरादा आहे पण ते आम्ही होऊ देणार नाही’, असा जोरदार पलटवार करतानाच ‘तुमच्या १०० पिढ्या खाली उतरल्या तरी मुंबई महापालिकेवरून शिवरायांचा भगवा झेंडा कोणी खाली उतरवू शकत नाही’, असा इशारा नेते संजय राऊत यांनी दिला आहे. या आव्हान-प्रतिआव्हानाच्या पार्श्वभूमीवर युती आघाडीच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत.
वाचा:
एकीकडे राज ठाकरे यांच्या मनसेशी हात मिळवू शकते असे बोलले जात असताना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि हे दोन पक्ष निवडणुकीत शिवसेनेसोबत असणार का, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. यात काँग्रेसच्या पालिकेतील प्रमुख नेत्याने खूप मोठे विधान करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई पालिकेत सध्या काँग्रेस विरोधी पक्षात आहे आणि विरोधी पक्षनेतेपदही काँग्रेसकडेच आहे. त्यामुळेच निवडणुकीतही आम्ही विरोधातच लढणार असे पालिकेतील काँग्रेसचे गटनेते व विरोधी पक्षनेते यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत उत्तर भारतीय मतदारही मोठ्या प्रमाणात आहेत. हे मतदान काँग्रेसला होते व त्यावर भाजपचा डोळा असल्याचे आम्हाला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे ही मते फोडण्याचा भाजपचा मनसुबा उधळण्यासाठी आम्हाला वेगळं लढावं लागेल, असे राजा म्हणाले. शिवसेना आणि काँग्रेसचा मतदार वेगळा आहे. त्यामुळे आम्ही आघाडी करून निवडणूक लढणे अयोग्य ठरेल, असे सांगतानाच निवडणुकीनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना-काँग्रेस आघाडी शक्य आहे, असेही रवी राजा यांनी स्पष्ट केले. राजा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मुंबई पालिका निवडणुकीत पक्षीय राजकारणाचे नवे रंग पाहायला मिळतील हे आताच स्पष्ट झाले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times