करोना संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारच्या आदेशानुसार १७ मार्चला शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर साईभक्तांसाठी बंद करण्यात आले होते. तब्बल आठ महिन्यानंतर हे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र दर्शनासाठी गर्दी होऊ नये, यासाठी दर्शनाच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. तसेच दर्शन सुलभ व सुखद व्हावे, यासाठी भक्तांना ऑनलाइन व मंदिर परिसरात काउंटरवर पासेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु दर्शनासाठी घालून देण्यात आलेल्या मर्यादेपेक्षा जास्त साईभक्त हे शिर्डीमध्ये आता येऊ लागले आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर कुठलेही नियोजन न करता शिर्डीत येऊच नका, असे आवाहन संस्थानने केले आहे.
‘गेल्या गुरुवारी व आज, रविवारी शिर्डीत दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे,’ असे सांगत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे म्हणाले, ‘साईभक्तांना विनंती आहे की त्यांनी दर्शनाची वेळ व तारीख निश्चित न करता शिर्डीत दर्शनासाठी येऊ नये. जर दर्शनाची वेळ व तारीख निश्चित न करता ते शिर्डीत दर्शनासाठी आले तर त्यांची गैरसोय होईल, तसेच गर्दीही वाढेल. गर्दी वाढल्यास करोनाचा प्रादुर्भाव होऊन दुसरी लाट येऊन विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कुठलेही नियोजन न करता शिर्डीत येऊ नये.
तर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले, ‘शिर्डी येथे शनिवार व रविवार साईभक्तांची दर्शनासाठी जास्त गर्दी होते. येथून मागचा ट्रेड पाहता रविवारी सकाळी ते दुपारी तीन पर्यंत मंदिर परिसरात भक्तांची चांगलीच गर्दी असते. तीन नंतर ही गर्दी कमी होते. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात येणाऱ्या साईभक्तांमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळले जावे, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.’
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times