म.टा. प्रतिनिधी, नगर: ‘महाराष्ट्रात करोना रोखण्यात सरकारला चांगलं यश आलं आहे. लॉकडाउनच्या शिथीलतेनंतर मात्र वाढणारी गर्दी हा चिंतेचा विषय ठरला आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळं व वाढणार्‍या थंडीमुळं करोना रुग्णांचा आलेख सध्या वाढतो आहे,’ असं मत राज्याचे महसूल मंत्री यांनी व्यक्त केलं आहे.

‘वाढलेली गर्दी पाहता करोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता नाकारता येणार नाही,’ अशी भीतीही थोरात यांनी व्यक्त केली आहे. करोनासंबंधी नागरिकांना आवाहन करताना थोरात यांनी म्हटलं आहे की, ‘मागील नऊ महिन्यांपासून संपूर्ण मानव जातीवर करोनाचं मोठं संकट आलं आहे. महाराष्ट्रात करोना रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं चांगलं काम केलं असून नागरिकांचंही मोठं सहकार्य लाभलं. मात्र लॉकडाउनच्या शिथीलतेनंतर व दिवाळीच्या काळात खरेदीसाठी झालेली गर्दी चिंता वाढविणारी आहे. करोना संकट अद्याप संपलेलं नसून प्रत्येकानं स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबीयांची काळजी घेतली पाहिजे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘सणासुदीच्या काळात नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळं व वाढणार्‍या थंडीमुळं करोना रुग्णांचा आलेख सध्या वाढतोय. युरोपियन राष्ट्रांमध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे. अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. भारतात दिल्लीमध्येही करोनाची मोठी चिंताजनक परिस्थिती आहे. त्यामुळं नागरिकांनी सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. महाविकास आघाडी सरकारनं माझं कुटुंब, माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत केलेल्या आरोग्य सर्वेक्षणामुळं महाराष्ट्रात करोनापासून काहीसा दिलासा मिळालाय. मात्र दिवाळीच्या काळात वाढलेली गर्दी पाहता करोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून विनाकारण घराबाहेर पडणं टाळा, कुठंही जास्त गर्दी करू नका, घरगुती समारंभ कमीत कमी उपस्थितीमध्ये करावेत, काही लक्षणं असल्यास तातडीनं जवळच्या वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करून घ्यावी,’ असं अवाहनही थोरात यांनी केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here