‘मनसे भाजपबरोबर जाणार ही बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे मला माहीत नाही. मात्र, सुपारी घेतल्याशिवाय काम करू शकत नाही, असे सांगत मनसे हा सुपारीवर चालणारा पक्ष असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनानेते आणि परिवहन मंत्री यांनी सोमवारी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना परब यांनी हे आरोप केले. राज ठाकरे यांचा मनसे पक्ष येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपबरोबर युती करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, ‘मनसेला कुणाची तरी सुपारी घ्यावीच लागेल. त्यांच्या पक्षाचे अस्तित्वच त्याच्यावर आहे. आज ना उद्या कुणाची तरी सुपारी घ्यायची आहे. वेगवेगळ्या पक्षांची सुपारी घेऊन झाली. आता ज्या भाजपच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणून उघडे केले, आता त्यांच्याबरोबरच गेल्याने काय होते ते कदाचित पुढे दिसेल, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. मनसेच्या मोर्चाबाबत बोलताना अजून आम्ही कुठल्याही जमावाला परवानगी दिलेली नाही. योग्य वेळेस निर्णय घेऊ असे ते म्हणाले.
मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवणार का या प्रश्नाला बोलताना मुंबई महापालिका निवडणूक कशी लढवली जाणार याचा निर्णय महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे प्रमुख एकत्रित चर्चा करुन घेतील असे परब यांनी सांगितले. तर विरोधी पक्षनेते यांच्या वक्तव्याविषयी बोलताना सरकार जाईल ही स्वप्न बघतच त्यांना पाच वर्षे काढायची आहेत असे परब म्हणाले. पाचव्या वर्षी पुन्हा त्यांचा स्वप्नभंग होणार. सत्तेविना ते अस्वस्थ झाले आहेत. कार्यकर्ते बिथरुन कुठे जाऊ नयेत म्हणून हे त्यांना बोलावे लागत आहे असेही ते म्हणाले.
वीज ग्राहकांना दिलासा देण्याची सरकारची भूमिका
वीज बिल आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘वाढीव बिले पाठवली, त्याचा नेमका कालावधी कुठला याचा सरकार बारकाईने अभ्यास करत आहे. त्यावर निर्णय झाला की भूमिका जाहीर केली जाईल. पण ग्राहकांना दिलासा देण्याची सरकारची भूमिका आहे असेही ते म्हणाले. ७ डिसेंबरच्या आधी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाबाबत निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times