पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनादरम्यान ‘दिलवाले’ या चित्रपटातील अभिनेता अजय देवगणचा एक लोकप्रिय डायलॉग मारला. त्यांनी सर्वांना सावध केलं. ‘मेरी कश्ती वहीं डूबी, जहां पानी कम था’ असं म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणातून कायम शेर-ओ-शायरी आणि कवितांचे ऐकवताना दिसून येतात.
पतंप्रधान मोदी जो डायलॉक बोलले तो ‘दिलवाले’ हा चित्रपट १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अजय देवगणने हा डायलॉग म्हटला होता. या चित्रपटात अजय देवगण सुनील शेट्टी आणि रविना टंडन हे मुख्य भूमिकेत होते. परेश रावल यांचीही महत्वाची भूमिका होती.
निष्काळजीपणा चालणार नाही
आपल्याकडे आता पुरेसा डेटा आहे. अशा परिस्थितीत पूर्ण तयारी आवश्यक आहे. सुरुवातीला करोनाची नागरिकांमध्ये भीती होती. त्या भीतीने नागरिकांनी आत्महत्याही केल्या. करोनावरून नागरिक एकमेकांकडे संशयाने पाहात होते. आता नागरिक करोनाबद्दल गंभीर बनत आहेत. पण करोना व्हायरस हा पूर्वीपेक्षा कमकुवत झाला आहे, असं नागरिकांना वाटत असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.
काही नागरिक आता निष्काळजीपणे वावरत आहेत. पण हे योग्य नाही. आपत्तीच्या खोल समुद्रातून आपण किनाऱ्याकडे वाटचाल करत आहोत. ज्या देशांमध्ये करोना रुग्ण कमी होत होते, तिथेही आता नवीन रुग्ण वाढू लागले आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकाने अधिक सावध राहिलं पाहिजे. आपल्याला मृत्यू दर १ टक्क्यापेक्षाही खाली ठेवण्याची गरज आहे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times