राज्यात दिवाळीनंतर करोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीत बाजारात झालेली गर्दी, नातेवाईकांच्या भेटीगाठी यामुळं पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्याप्रमाणे दिवाळीनंतर करोना मुक्त रुग्णांपेक्षा करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. राज्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर, हीच त्रीसूत्री असल्याचं प्रशासनाकडून वेळोवेळी सांगण्यात येतंय. दिवाळीनंतर करोनाविरुद्धची ही लढाई निर्णयाक टप्प्यावर आली आहे.
आज राज्यात ६ हजार १५९ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज ४ हजार ८४४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात आता एकूण करोना मुक्त रुग्णांची संख्या १६ लाख ६३ हजार ७२३ इतकी झाली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२. ६४ टक्के इतके झाले आहे. राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असताना राज्यात जिल्ह्यात मृत्यूदर नियंत्रणात ठेवणं शक्य झाले आहे. आज राज्यात एकूण ६५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २. ६० टक्के इतका आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट घोंघावत असताना राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांबाबत मोठा दिलासा मिळतोय. सध्या राज्यात ८४ हजार ४६४ अॅक्टिव्ह रुग्ण असून राज्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०४,५६,९६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,९५,९५९ (१७.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२९,३४४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times