वाचा:
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीलाच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि करोनाही आला, असे सांगत हे संकट हा मुख्यमंत्र्यांचा पायगुण असल्याचा टोला राणे यांनी लगावला होता. त्याआधीही राणे यांनी अनेकदा हे सरकार निष्क्रीय आहे, हे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी वक्तव्ये केलेली होती. त्याचा अकोला येथे बोलताना जयंत पाटील यांना समाचार घेतला होता. गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं, अशा शब्दांत पाटील यांनी राणेंच्या आरोपांची खिल्ली उडवली होती. राणेंच्या टीकेला गंभीरपणे घेण्याची गरज नाही, असेही पाटील म्हणाले होते. आज रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिलं व धक्कादायक दावाही केला.
वाचा:
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं नसतं तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तुम्हाला आज भाजपात दिसले असते, असा दावा करतानाच जयंत पाटील यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही झाली होती, असा गौप्यस्फोट राणे यांनी केला. जयंत पाटील यांना मी त्यांच्या इस्लामपुरात जाऊन उत्तर देणार आहे. त्यांच्याबाबत जी माझ्याकडे माहिती आहे ती मी तिथेच उघड करणार आहे, असेही राणे म्हणाले. पुढचं सरकार आमचंच येणार असे जयंत पाटील म्हणताहेत. कदाचित पुढील सरकारमध्येही मी मंत्री असणार असे त्यांना म्हणायचे असेल, असा टोलाही राणे यांनी लगावला.
वाचा:
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच भाजप नेत्यांनी राज्यभर पत्रकार परिषदा घेऊन सरकारवर हल्ले चढवले होते. त्यात विरोधी पक्षनेते , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि नारायण राणे हे आघाडीवर राहिले. भाजपचे हे हल्ले परतवून लावण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेतेही मैदानात उतरले. त्यामुळेच गेले काही दिवस आघाडी व भाजप नेत्यांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times