स्मिथला जर लवकर बाद करायचे असेल, तर तो ज्यावेळी फलंदाजीला येईल त्यावेळी वेगवान गोलंदाजांना संधी देऊ नये. स्मिथ फलंदाजीला आल्यावर युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोघांना गोलंदाजीला आणायला हवे. कारण आतापर्यंत स्मिथ हा फिरकी गोलंदाजीवर सुरुवातीला मोठे फटके खेळत नसल्याचे पाहायला मिळाले आहे. वेगवान गोलंदाजीवर तो चांगली फटकेबाजी करतो आणि एकदा स्थिरस्थावर झाल्यावर त्याला कोणीही लवकर आऊट करू शकत नाही. त्यामुळे स्मिथला जर स्थिरस्थावर व्हायला द्यायचे नसेल तर तो फलंदाजीला आल्यावर फिरकीपटूंना गोलंदाजी करायला द्यायला हवी. जर भारताने असे केले तर नक्कीच स्मिथ लवकर बाद होईल. त्यामुळे स्मिथला लवकर बाद करण्यासाठी भारताने ही गोष्ट करायलाच हवी, असा विश्वास भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने व्यक्त केला आहे.
भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात १०५ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या वनडेमध्येही स्मिथने शतक झळकावत १०४ धावा केल्या होत्या. स्मिथच्या या दोन शतकी खेळींमुळेच ऑस्ट्रेलियाला दोन्ही सामन्यांमध्ये ३५०पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारता आला. त्यामुळे जर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जर स्मिथ लवकर बाद झाला तर ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता येणार नाही.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावलेली आहे. पण तिसऱ्या सामन्यात पराभूत होण्याची नाचक्की भारतीय संघावर येते का, हे तिसऱ्या सामन्यात समजू शकणार आहे. भारताने मालिका गमावली असली तरी हा सामना जिंकून भारत आपली लाज वाचवू शकतो, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय सामन्यात भारत विजय मिळवणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times