केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान राज्यातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाच्या निमित्ताने शेतकरी दिल्लीत एकवटले आहेत. त्यावर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला होता. कडाक्याच्या थंडीतही पाण्याचे फवारे, अश्रुधूर आणि लाठी हल्ला करत सरकारने अमानुषपणे शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याची टीका महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिकांनी केली आहे. दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभे राहणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, असे ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, भास्कर चंदनशिव, अतुल देऊळगावकर, नारायण कुळकर्णी कवठेकर, आसाराम लोमटे, आनंद विंगकर, प्रमोद मुनघाटे, बालाजी सुतार, सुरेखा दळवी, अरुणा सबाने यांनी निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.
देशभरातल्या शेतकऱ्यांच्या मतांचा विचार न करता, त्यांना विश्वासात न घेता, न जुमानता मोदी सरकारने विधेयके मंजूर केली. या कायद्यामुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि जमिनीच्या तुकड्यावर श्रम करीत गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांना हद्दपार करतील अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. कोरडवाहू आणि आर्थिकदृष्ट्या दुबळ्या असलेल्या शेतकऱ्यांना शेतमालाच्या हमीभावाचे जे कवच आहे ते गळून पडेल अशी शेतकऱ्यांची भावना आहे. त्याकडे साफ दुर्लक्ष करून सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणे हे केवळ अमानुषच नव्हे तर निषेधार्ह आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यापासून शेतकऱ्यांचा असंतोष खदखदत असताना त्यांच्याशी संवाद करण्याचे दायित्वसुद्धा हे सरकार पार पाडत नाही. शेतीच्या शोषणव्यवस्थेची मांडणी करणाऱ्या महात्मा जोतीराव फुले यांच्यापासून क्रांतिसिंह नाना पाटलांपर्यंत अनेक धुरीणांनी याच मातीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने लढे दिले, असे साहित्यिकांनी म्हटले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times