वाचा:
पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी दुपारी जिल्हा कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी खडसे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर अनेकांनी मला विचारणा केली की, तुम्ही राष्ट्रवादीचाच पर्याय का निवडला? भाजप मी सोडली नाही, तर मला भाजपने अक्षरशः बाहेर ढकलले. भाजपने मला पक्ष सोडायला भाग पाडले. अशा परिस्थितीत बहुजन समाजाला खऱ्याअर्थाने न्याय देणारे शरद पवारच आहेत. म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी मैलाचे दगड ठरतील, असे निर्णय घेतले. माझे पहिले मुख्यमंत्री म्हणून मी नव्वदीच्या दशकामध्ये त्यांच्यासोबत काम केले आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देण्याचे काम शरद पवारांनी केले. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून पवारांनी चांगले निर्णय घेतले. पवारांच्या उत्तम कामगिरीचे अनेक पैलू सांगता येतील, असेही खडसे यावेळी म्हणाले.
वाचा:
महाविकास आघाडी सरकारला धोका नाही
आज ना उद्या सरकार पडेल, असे भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. पण वर्ष झाले अजून तसे काहीही घडलेले नाही. सत्तेत येण्यासाठी भाजपला एका विशिष्ट पक्षाचे पूर्ण समर्थन हवे आहे. एखादा पक्ष तिकडे गेल्याशिवाय भाजपचे सरकार येऊच शकत नाही. उपमुख्यमंत्री पदावर काम करतील का? नाही ना, मग शिवसेना तिकडे भाजपसोबत जाणारच नाही. काँग्रेस तर उभ्या हयातीत भाजपसोबत जाऊ शकत नाही. राष्ट्रवादीचा विषयच नाही. एकदा भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. पण काय झाले? याचा त्यांना चांगला अनुभव आहे, असा चिमटा खडसेंनी यावेळी सरकार कोसळण्याच्या मुद्द्यावर बोलताना भाजपला काढला. भाजप आपले आमदार सांभाळण्यासाठी हे सरकार पडणार असल्याचे उद्योग करत आहे. मीही तिकडे भाजपत असताना असे उद्योग केले आहेत. आमदार सांभाळण्यासाठी तसे करावेच लागते, अशी पुष्टीही खडसे यांनी जोडली.
वाचा:
अटलजींनी तर ट्रक चालवला होता
महाविकास आघाडीचे सरकार हे तीन पक्षाचे रिक्षा सरकार म्हणून भाजपचे नेते सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करतात. मग अटलजींनी तर ३२ पक्षांचा महाट्रक चालवला होता. त्यांनी अनेकांचे सरकार सांभाळले होते. तर मग तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार का सक्षमपणे चालणार नाही, असेही खडसेंनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times