पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलाल शेख या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात छळ, ब्लॅकमेल, धमकावणे, बदनामी करणे आणि आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शेखला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, त्याच्याकडील मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे.
३० वर्षीय तरुणी आणि संबंधित तरूण पाच वर्षांपूर्वी कॉलेजला असताना मित्र होते. त्या दोघांनी लग्न करायचे ठरवले होते. शेखचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबईतील सानपाडा येथील खासगी कंपनीत नोकरी करू लागला. त्याचदरम्यान त्याने तिला पनवेलच्या एखा हॉटेलमध्ये नेले. तिथे दोघांनी काही वेळ एकांतात घालवला. काही फोटोही काढले. तिने लग्नाचा विषय काढला की तो टाळायचा. तो आणि त्याचे कुटुंब रत्नागिरीतील असल्याची माहिती तिला होती. वारंवार नकार देत असल्याने अखेर तिने मैत्री तोडली. मात्र, त्यानंतर तो तिला त्रास देऊ लागला. डिसेंबर २०१९मध्ये तिने तिच्या बहिणीला याबाबत सांगितले. तिने शेखला फोन करून समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही दिवसांनी त्याने तिच्या नातेवाइकांना फोन केले आणि तिची बदनामी केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times