मुंबईः आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्राविरोधात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक यांनी मुंबई उच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग न्यायलयात १९१४ पानी आरोपपात्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात रायगड पोलिसांनी ६५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या आरोपपत्राविरोधात अर्णब गोस्वामी यांनी न्यायालयात धाव घेतली असून आरोपपत्राची दखल घेऊ नये, असे निर्देश अलिबाग कोर्टाला द्यावेत, अशी हायकोर्टाला अर्जाद्वारे विनंती केली आहे.

राज्य सरकारची संपूर्ण कारवाई ही कुहेतूने आणि मला लक्ष्य करण्यासाठीच आहे. म्हणूनच सत्तेचा गैरवापर करत माझ्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करून अलिबाग कोर्टाला निर्देश द्यावेत, असं या अर्जात नमूद केलं आहे.

दरम्यान, अलिबाग येथील प्रसिद्ध वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी व अन्य दोन जणांना रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली होती. या कारवाईवरून बरंच वादळ उठलं होतं. अलिबाग येथील दंडाधिकारी न्यायालयाने या तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

अलिबाग कोर्टात तातडीने सुनावणीस नकार मिळाल्याने त्यांनी लगेचच मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, तिथेही त्यांना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर अर्णब यांनी थेट सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. तिथे सुनावणी होऊन अर्णब यांना जामीन मंजूर झाला आणि त्याचदिवशी तळोजा कारागृहातून त्यांना मुक्तही करण्यात आले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here