शेतकरी नेत्यांसोबत आज चर्चेची पाचवी फेरी झाली. चर्चा अतिशय चांगल्या वातावरणात झाली. एमएसपी कायम राहील यावर शंका घेणं निरर्थक आहे. तरीही कुणालाही याबद्दल आणखी शंका असेल तर सरकार त्यांचे निरसण करण्यास तयार आहे, असं तोमर यांनी सांगितलं.
एपीएमसी कायदा हा राज्याचा आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करण्याचा आमचा हेतू नाही किंवा त्यावर परिणामही होणार नाही. एपीएमसी अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी तयार आहे. याबद्दल काही तक्रारी किंवा शंका असल्यास त्या दूर करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं तोमर यांनी बाजार समित्यांच्या मुद्द्यावर स्पष्ट केलं.
शेतकर्यांकडून सूचना मागवल्या
आजच्या बैठकीत सर्व विषयांवर चर्चा झाली. शेतकऱ्यांकडून आम्हाला काही सूचना मिळतील, अशी आमची अपेक्षा होती. पण चर्चेदरम्यान ते शक्य झालं नाही. आता शेतकरी नेत्यांसोबत ९ डिसेंबरला पुन्हा चर्चा होईल. सरकार शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी तयार आहे. त्यांच्याकडून आम्हाला काही सूचना मिळाल्या तर बरं होईल. आम्ही अजूनही त्यांच्या सूचनांची वाट पाहत आहोत, असं म्हणत तोमर यांनी शेतकरी संघटनांना आवाहन केलं.
थंडीचे दिवस आहेत आणि त्यातही करोना व्हायरसचे संकट आहे. यामुळे वृद्ध आणि लहान मुलांना घरी पाठवावं. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात शेतकर्यांचं उत्पन्न वाढलं आहे. शासकीय खरेदी वाढली आहे. शेतकऱ्यांची वाटचाल समृद्धीकडे होईल यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकरी सन्मान निधीद्वारे वर्षातून सरकारकडून ७५ हजार कोटी रुपये दिले जातात, असं तोमर म्हणाले.
जे काही होईल किंवा केले जाईल ते फक्त शेतकऱ्यांच्या हिताचे असेल. या देशातील शेतकऱ्यांनी विश्वास ठेवावा. शेतकरी संघटना आणि आंदोलनकर्त्यांनी शिस्त पाळली आहे. याबद्दल सर्वांचे आभार. पण काही मुद्दे स्पष्टपणे मांडल्यास तोडगा काढणं सोपं जाईल, असं सर्व शेतकरी बांधवांना आवाहन असल्याचं म्हणाले.
भारत बंद टिप्पणी करण्याची इच्छा नाही. संघटनांचे आपले कार्यक्रम असतात. केंद्र सरकारने चर्चेच्या अनेक फेऱ्या घेतल्या आहेत आणि पुढील चर्चेसाठीही आम्ही तयार आहोत. आज चर्चा पूर्ण होऊ शकली नाही. आता ९ डिसेंबरला पुन्हा बैठक होणार आहे, असं तोमर यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times