म.टा. प्रतिनिधी, नगर: दिल्लीत आंदोलन करण्यासाठी जे लोक गोळा झाले आहेत, हे सर्व भामटे लोक आहेत. दिल्लीचे आंदोलन म्हणजे दुसरे शाहीनबागच सुरू झाले आहे. याचापेक्षा त्याचा दुसरा काही अर्थ नाही,’ अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. ते नगरमध्ये बोलत होते.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाबाबत शंका उपस्थित करतानाच रघुनाथदादा पाटील यांनी भाजपसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे. शेतकरी संघटनेची जनप्रबोधन यात्रा आज नगरमध्ये आली होती यावेळी माध्यमांशी बोलताना रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘दिल्लीचे आंदोलन हे फसवून आणलेल्या शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांपेक्षा तेथे आडते, हमाल असे लोक अधिक आहेत. त्यामुळे हे आंदोलन शेतकऱ्यांचे आंदोलन मी मानत नाही. कारण शेतकऱ्यांच्या विरोधात असे काही कायदे झाले आहेत की त्या बाबतीत दिल्लीच्या आंदोलनात कोणी बोलत नाहीत. वन्यप्राणी संरक्षण कायदा, गोवंश हत्याबंदी कायदा, जमीन अधिग्रहण कायदा, याबाबतीत हे आंदोलक काही बोलत नाहीत. दिल्लीत आंदोलन करण्यासाठी जी लोक गोळा झाले हे सर्व भामटे लोक आहेत,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

‘शेतकऱ्यांना खरा त्रास ज्या कायद्यापासून आहे, त्या कायद्यांचा उच्चार सुद्धा या आंदोलनात कोणी करायला तयार नाही. आज जे चालले आहे तसेच कायदे २००६ ला मनमोहन सिंग यांनी केले, तेव्हा भाजपने विरोध केला. आज कायदे करीत आहे, तर विरोध करीत आहे. याचाच अर्थ असा आहे की काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशात ७० वर्षे काँग्रेसची राजवट होती, त्यांनी शेतमालाची निर्यातबंदी उठवली नाही. सहा वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाले तर पाच वर्षे वाजपेयी सरकार झाले, त्यांनी ही निर्यातबंदी उठवली नाही. भाजप व काँग्रेस या दोघांचे आर्थिक धोरणे एकच आहे. हे फक्त मतांच्या राजकारणासाठी चालले आहे. दिल्लीचे आंदोलन म्हणजे दुसरे शाहीनबाग सुरू झाले आहे. त्याच्यापेक्षा त्याचा दुसरा काही अर्थ नाही,’ असेही ते म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here