म. टा. प्रतिनिधी, जळगाव: शेतकऱ्यांवर अन्याय ( ) करू नका, अन्यथा ज्या तख्तावर तुम्ही बसले आहात, तो तख्त शेतकरी बदलून टाकतील, अशा शब्दांत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढविला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी दुपारी रेल्वे स्थानकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुलाबराव पाटील यांनी अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्यासाठी कायदा बनवला, त्या शेतकऱ्यांवर आज अन्याय होत आहे. केंद्र सरकारकडून कायद्याची पायमल्ली करण्याचा प्रयत्न होत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय करणे थांबवले पाहिजे. अन्यथा दिल्ली दूर नाही. तुमची तीन वर्षे उरली आहेत. या तख्तावर शेतकऱ्यांनी तुम्हाला बसवले आहे, तो तख्त शेतकरी बदलून टाकतील. ज्या बुरुजावर तुम्ही आज बसले आहात, तो बुरुज शेतकरी आडवा करतील. शेतकरी एका दणक्यात बैलाला सरळ करू शकतो, हे तर सरकार आहे, असेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

जळगाव जिल्ह्यात मंगळवारी शाळा उघडणार

जळगाव जिल्ह्यात मंगळवारी शाळा उघडणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली. शाळा उघडण्यास संदर्भात स्थानिक प्रशासनाकडून नियमावली तयार करण्यात येणार आहे. आगामी काळात कोरोनाची रुग्ण संख्या वाढणार नाही, या अनुषंगाने ही नियमावली असणार आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने नियमांच्या अधीन राहूनच शाळा सुरू होणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here