म. टा. प्रतिनिधी,

मुंबई महानगर प्रदेशात सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी वाहतूक प्रकल्पांना विविध ठिकाणी जोडणी दिल्यास पुढील १० वर्षांत नागरिकांसाठी पहिला निर्माण होऊ शकतो, असा विश्वास ‘एमएमआरडीए’चे आयुक्त आर. ए. राजीव यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे साहजिकच २०३० नंतर मुंबईकर विनाथांबा महामुंबईला प्रदक्षिणा घालू शकणार आहेत.

साधारण २०१८ साली प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेल्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंक मार्गाचा (शिवडी ते न्हावाशेवा) सद्यस्थितीचा आढावा अलिकडेच नगरविकासमंत्री यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. दक्षिण मुंबईला थेट रायगड जिल्ह्याला जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०२२ साली लोकार्पित करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. हा मार्ग शिवडीकडे वरळी-शिवडी कनेक्टर तसेच पूर्व मुक्तमार्गाला जोडण्यात येणार आहे. तर, नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरला याची थेट जोडणी असेल. तसेच जेएनपीटी, राज्य महामार्ग ५४, मुंबई-पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग या दिशेने प्रवास करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागात योग्य ठिकाणी इंटरचेंज सुविधा असेल. विशेष म्हणजे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा चिर्ले येथून अवघ्या आठ किमी अंतरावर आहे. मात्र या पुढे जाऊन हीच साखळी रिंगरूटच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मुंबईच्या दिशेने फिरवण्यासाठी आगामी नियोजन सुरू असल्याचे महानगर आयुक्तांनी स्पष्ट केले.

या नियोजनानुसार, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोडवरून निघालेले वाहन सर्वप्रथम विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरवर येईल. तिथून विरारच्या दिशेने प्रवास सुरू करू शकेल. पुढे प्रस्तावित वसई-मीरा भाईंदर उन्नत मार्गावरून, प्रस्तावित वर्सोवा मीरा-भाईंदर सागरी पूल आणि सध्या काम सुरू असलेला वांद्रे-वर्सोवा सेतूवर येईल. पुढे वांद्रे वरळी सीलिंकवरून पुन्हा वरळी-शिवडी कनेक्टरमार्गे मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोडला येऊन आपली मुंबईभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करू शकणार आहे. हे सर्व मार्ग सिग्नलविरहित असल्याने ही प्रदक्षिणादेखील सिग्नलविरहित रिंगरूटच्या रूपाने २०३० सालापर्यत मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल असा विश्वास एमएमआरडीए प्रशासनाला आहे. त्यामुळे पुढील १० वर्षांत हा सिग्नलविरहित रिंगरूट तयार करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीए प्रयत्नशील असून, सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा विश्वास राजीव यांनी बोलून दाखवला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here