मुंबईः दिवाळीमध्ये वाढलेली करोना रुग्णांची संख्या आता कमी होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत ७० करोना बाधित रुग्ण दगावले असून ३ हजार ८२४ नवीन रुग्ण राज्यात सापडले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

राज्यात गेल्या आठ महिन्यांपासून करोनानं थैमान घातलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून करोनाचा जोर ओसरताना दिसत आहे. दिवाळीनंतर वाढलेली करोनाची संख्या आता कमी होत आहे. आज राज्यात ३ हजार ८२४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १८ लाख ६८ हजार १७२ इतकी झाली आहे.

राज्यात आज पुन्हा एकदा करोना मुक्त रुग्णांची संख्या करोनाबाधितांपेक्षा अधिक आहे. त्यामुळं काही अंशी दिलासा मिळाला आहे. आज राज्यात ५ हजार ००८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, त्यामुळं राज्यात आजपर्यंत १७ लाख ४७ हजार १९९ करोना बाधित रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३. ५२ टक्के इतके झाले आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यात सध्या ७१ हजार ९१० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्णवाढी बरोबरच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होताना दिसत आहे. त्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांना यश येत असल्याचं चित्र आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १५ लाख ०२ हजार ४२७ चाचण्यांपैकी १८ लाख ६८ हजार १७२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या राज्यात ५ लाख ४१ हजार ०५९ व्यक्ती होम क्वारंटाइन असून ५ हजार १३६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

दरम्यान, १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली. शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी ८०० रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्याला मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here