मुंबई: करोना रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण कमी झाल्यास १५ डिसेंबरनंतर मुंबईतील लोकल सेवा सुरू केली जाईल, असं काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं. मात्र, मुंबई महापालिका इतक्यात हा धोका पत्करण्यास तयार नसल्याचं दिसत आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आता या संदर्भात नवी माहिती दिली आहे. (BMC Commissioner about Local Train)

वाचा:

‘मुंबईतील करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागले आहेत. महापालिकेचे करोना योद्धे दिवसरात्र एक करून काम करत आहेत. सुरक्षेचे नियम पाळले जावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत कुठलाही निर्णय घाईने घेऊन आतापर्यंतच्या कामावर बोळा फिरवण्याची इच्छा नाही. ख्रिसमस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनची परिस्थिती पाहून, त्यानंतरच सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे गाड्या सुरू करता येतील का, याविषयी आम्ही राज्य सरकारला शिफारस करू, असं चहल यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं मुंबईकरांना लोकल ट्रेनसाठी नवीन वर्षापर्यंत वाट पाहावी लागेल, अशी शक्यता आहे.

वाचा:

सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, कोर्टाचे कर्मचारी व महिलांना लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळं मोठ्या संख्येनं मुंबईकर बेस्ट, मेट्रो व अन्य खासगी वाहनांनी प्रवास करत आहेत. लवकरात लवकर लोकल ट्रेन सुरू व्हावी अशी मागणी सर्वसामान्यांसह रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे. मात्र, लोकल सुरू होण्यासाठी पुढचे तीन आठवडे निर्णायक ठरणार आहेत.

थर्टी फर्स्टच्या रात्री संचारबंदी?

करोनाचा धोका अद्याप पूर्णतः संपलेला नसतानाही अनेक ठिकाणच्या नाइट क्लब्जकडून सुरक्षित वावराच्या नियमांचे उल्लंघन केलं जात आहे. येत्या २५ डिसेंबरला नाताळ आणि ३१ डिसेंबरला नववर्ष स्वागताच्या पार्ट्या क्लब्जकडून आयोजित होण्याची शक्यता आहे. केवळ मौजमजा करण्याच्या नावाखाली नागरिक मोठ्या प्रमाणात, नियम न पाळता एकत्रित आल्यास करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढेल, अशी भीती आहे. येत्या २० डिसेंबरपर्यंत हे चित्र सुधारले नाही तर २० नंतर मुंबईत रात्री ११ ते सकाळी सहा या वेळेत संचारबंदी लागू केली जाईल, असा इशाराही चहल यांनी दिला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here