मध्य रेल्वेनं २०१९मध्ये फुकट प्रवाशांकडून केलेल्या दंडवसुलीची माहिती दिली आहे. त्यात चार टीसींनी जबरदस्त कामगिरी करून विक्रमी दंडवसुली केली आहे. या चारही टीसींनी प्रत्येकी १ कोटी रुपयांहून अधिकचा दंड वसूल केला आहे. त्यातील एस. बी. गलांडे यांनी २२, ६८० प्रवाशांकडून १.५१ कोटी रुपयांची वसुली दंडस्वरुपात केली आहे. तर त्यांचे सहकारी रवी कुमार यांनी २०, ६५७ प्रवाशांकडून १.४५ कोटी, एम. एम. शिंदे यांनी १६,०३५ प्रवाशांकडून १.०७ कोटी, तर डी. कुमार यांनी १५,२६४ प्रवाशांकडून १.०२ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.
मध्य रेल्वेच्या उपनगरी गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक जण द्वितीय श्रेणीचं तिकीट घेऊन प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करतात. गलांडे यांनी दरदिवशी ७२ प्रवाशांकडून दंड वसूल केला आहे. एक सरासरी एका दिवसाला विनातिकीट प्रवास करणाऱ्या आठ प्रवशांकडून दोन हजार रुपये वसूल करतो. वर्षाला ६.३ लाख रुपये होतात. तर एका तिकीट तपासनीसाचे वेतन ज्येष्ठतेनुसार, प्रतिमहिना सरासरी ५० ते ६० हजार रुपये असते.
गलांडे, शिंदे, डी. कुमार प्रिंसिपल चीफ कमर्शियल मॅनेजरच्या फ्लाइंग स्क्वॉडमद्ये आहेत. त्यात मध्य रेल्वेशी संलग्न २९ टीसी असतात. ते लोकल गाड्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील फुकट्या प्रवाशांकडून दंड वसुली करतात. तर रवी कुमार मुंबई विभागात कार्यरत आहेत. त्यांना मुंबई उपनगरी लोकलगाड्यांमध्ये आणि मुंबईतून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये फुकट्या प्रवाशांकडून दंड वसुली करतात. गलांडे म्हणाले की, दिवसातील सरासरी बारा ते तेरा तास ट्रेनमध्येच असतो. पत्नी आणि दोन मुले आहेत. पण घरी वेळ द्यावा यासाठी कधीच हट्ट धरत नाहीत. पत्नी घर सांभाळते. त्यांच्याकडून मला ताकद मिळते. रवी कुमार यांनीही या कामगिरीचं श्रेय त्यांच्या पत्नीला दिलं आहे.
प्रोत्साहन मिळाल्यानं कामगिरी अधिक उत्तम होते
सेमिनार आयोजित करून लोकांमध्ये वर्क कल्चरच्या दृष्टीनं अनेक बदल घडवून आणले गेले आहेत. दर दोन महिन्यांनी चांगली कामगिरी करणाऱ्यांना प्रवाशांची संख्या आणि दंड वसुलीच्या आधारे सन्मानित केलं जातं. मेहनतीचं फळ आणि प्रोत्साहन यामुळं काम अधिक चांगलं होतं. नवी ऊर्जा मिळते, असंही या टीसींनी सांगितलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times