मुंबईत छोट्याशा जागांनाही सोन्याचे भाव आलेले असल्याने कुठे फुकट घर मिळतेय असे म्हटले, तर तोबा गर्दी होणे स्वाभाविकच आहे. तसेच दृश्य रविवारी विक्रोळी- कांजूरमार्ग भागात दिसले. या परिसरातील राज्य सरकारच्या भूखंडावर घरासाठी फुकट जागा मिळत असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरली होती. त्यामुळे इथे झोपड्या बांधण्यासाठी तुफान गर्दी झाली. ही बाब लक्षात येताच, पालिका आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून रविवारी या झोपड्यांवर कारवाई केली.
आणि कांजूरमार्गच्या दरम्यान असलेल्या भागात सरकारी मालकीचे दोन मोठे भूखंड आहेत. या भूखंडांवर सरकारकडून बेघरांना फुकटात जागा दिली जात असल्याची अफवा पसरली. सोशल मीडियासह विविध माध्यमांतून ही अफवा कानोकानी गेली. मग हळुहळू एक – एक करत सुमारे ४०० कुटुंबांनी इथे बस्तान मांडले. ‘ही जागा एका व्यावसायिकाची असून त्याने निधनांनंतर ही जागा गरिबांना दान दिली आहे,’ अशा प्रकारची अफवा पसरल्याने या जागेवर गरजूंनी प्रचंड गर्दी केली.
मुंबईसह विविध भागातून कुटुंबांचे लोंढे जमा झाल्याने त्याची चर्चा सुरू झाली. सरकारी जमिनीवर झोपड्या उभ्या करण्याची लगबगदेखील वाढली. ही बाब पालिका आणि पोलिसांच्या नजरेस येताच त्यांनी हस्तक्षेप केला. दोन्ही यंत्रणांनी अफवेचे शिकार ठरलेल्या बेघरांची समजूत काढली. तसेच अवैध झोपड्यांवर कारवाई केली. सरकारी भूखंड असुरक्षित नेमक्या या भूखंडाजवळच कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडसाठीचा भूखंड आहे. त्यामुळे मुंबईतील सरकारी मालकीचे भूखंड किती असुरक्षित आहेत, हे या प्रकरणावरून नव्याने दिसून आले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times