‘लष्करात जाऊन भारतमातेची सेवा करण्याचे स्वप्न गावातीलच तिघांमुळे धुळीस मिळाले आहे,’ असे दु:ख स्वप्नालीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मांडले आहे. स्वप्नालीने सहा डिसेंबरच्या रात्री गळफास घेतल्यावर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तिच्या मृत्यूची अकस्मात मयत म्हणून नोंद केली. मात्र, १० डिसेंबर रोजी तिच्या दप्तरात सापडलेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, तिघांनाही पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
स्वप्नालीच्या वडिलांचा गावात पंक्चर काढण्याचा व्यवसाय आहे. त्यांचा अपघात झाल्यावर स्वप्नाली घरकामासोबतच वडिलांना या कामातही मदत करत होती. लष्करात भरती व्हायचे म्हणून ती नियमित व्यायामही करत होती. करोनामुळे तिचे अकरावीचे शिक्षण घरूनच सुरू होते. मात्र, ‘गावातील रमेश गाजरे, स्वप्नील कौलगी आणि लहू टेलर यांच्याकडून सातत्याने होत असल्याने जीवन संपवत आहे. आता मला सहन होत नाही. तिरंगा आणि लष्कराचा गणवेश माझ्या नशिबी नाही. हे भारतमाते मला माफ कर,’ असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे.
या छेडछाडीचा त्रास ती नववीत असल्यापासून सहन करत होती. याबाबत तिने आई-वडिलांनाही सांगितले होते. वडिलांनी प्रयत्न करूनही छेडछाड थांबली नसल्याने अखेर तिने जीवन संपवले. आता पोलिस स्वप्नालीच्या चिठ्ठीवरून तपास करीत आहेत. या तीन आरोपींत दोन आरोपी विवाहित असून, एकजण पन्नाशीतील आहे. त्यामुळे, या प्रकरणातील गूढ आता वाढत चालले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times