लॉकडाऊननंतर जवळपास सर्वच क्षेत्रे खुली झाली असली तरी अद्याप सर्वांसाठी खुली झालेली नाही. त्यामुळं चाकरमान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकलअभावी बेस्ट बस व अन्य वाहतूक सेवांवर ताण येत आहे. त्यातून सोशल डिस्टन्सचा प्रश्नही निर्माण होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेन लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. राज्य सरकारकडून या संदर्भात दर १५ दिवसांनी नवनव्या तारखा दिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी १५ डिसेंबरनंतर लोकल ट्रेन सुरू करण्याचे संकेत देण्यात आले होते. आता नवीन वर्षाचा मुहूर्त सांगितला जात आहे.
विधान भवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार यांनी आज याबाबत सरकारची भूमिका मांडली. ‘कुणीही मास्क न घालता ट्रेनमध्ये चढणार नाही. गर्दी कशी नियंत्रणात ठेवता येईल, त्यासाठी पोलीस व अन्य मनुष्यबळ नेमकं किती लागेल, यासाठीची चाचपणी पूर्ण झाली आहे. त्यामुळं नवीन वर्षात लोकल सुरू होऊ शकते. पहिल्या तारखेपासूनच सर्वांसाठी लोकल खुली करण्याचा प्रयत्न आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
‘लोकलअभावी मुंबई सध्या ठप्प आहे. हातावर पोट असलेल्या लोकांसाठी लोकल ट्रेनची नितांत गरज आहे. काही दिवसांपूर्वी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती. मात्र, आता करोनाचं संकट काही प्रमाणात दूर झालं आहे. रुग्णांची संख्याही कमी होतेय,’ असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times