महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष युतीने लढले होते. मात्र निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षांचं बिनसलं. त्यानंतर राज्यात अभूतपूर्व अशी उलथापालथ झाली आणि शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी अस्तित्वात आली. ही आघाडी सत्तेत विराजमान झाली. आज राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत पवारांनी नवी आघाडी कशी आकाराला आली, त्याचा उहापोह केला.
शिवसेनेसोबत आघाडी करण्याआधी आम्ही त्यावर बराच खल केला. महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीतूनही जनभावना जाणून घेतल्या. त्यात अल्पसंख्याक समाजाकडून या आघाडीचे स्वागत करण्यात आले. शिवसेनेसोबत राष्ट्रवादीची आघाडी होण्यास व ती दीर्घकाळ पुढे नेण्यास आमची काहीच हरकत नाही, असा सूर अल्पसंख्याकांमधून निघाला. शिवसेनेसोबत आघाडी करताना भाजपला मात्र तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सत्तेपासून दूर ठेवा, असे सर्वांचेच म्हणणे होते, असेही पवार यांनी पुढे नमूद केले.
पाच वर्षांपूर्वीची देशातील स्थिती आणि भाजपचे सरकार आल्यानंतरची स्थिती याचा विचार करण्याची गरज आहे. आज देशात कुठेही गेल्यास लोक महाराष्ट्राची स्तुती करतात. महाराष्ट्राने आम्हाला नवी दिशा दाखवली आहे आणि त्या दिशेने आम्ही मार्गक्रमण करणार आहोत, असे सांगितले जाते. ही बाब आपल्याला प्रेरणा देणारी असून आपण आपली विचारधारा अधिक मजबूत करण्यासाठी येत्या काळात पावले उचलायला हवीत, असे पवार यांनी पुढे सांगितले.
केंद्र सरकारकडून अलीकडे जे काही निर्णय घेण्यात आले आहेत त्यातून समाजातील काही लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. समाजा-समाजात फूट पाडण्याचे काम, समाजातील एकजूट तोडण्याचे काम सध्याचे शासन करत आहे. देशाच्या एकतेसाठी हे मोठे संकट आहे. अशा विचारधारेला कशाप्रकारे दूर लोटता येईल, याचा आपण सगळ्यांनीच विचार करण्याची आवश्यकता आहे, असे पवार म्हणाले.
महत्त्वाचे…
> क्रिकेट क्षेत्रात काम करत असताना मी पाकिस्तानमध्ये बैठकीला गेलो होतो. तेव्हा असे अनेक लोक मला भेटले ज्यांचा एकतरी नातेवाईक भारतात आहे. त्यांची मनापासून इच्छा आहे की, त्यांच्या नातेवाईकांसोबत भेटीगाठी व्हाव्यात. पण केवळ ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांना भारतात येण्यास परवानगी मिळत नाही.
> केंद्र सरकारचे आज समाजातील मागासलेल्या वर्गाकडे लक्ष नाही. या वर्गासाठी परिवर्तन करण्याचे काम आपण केले पाहिजे. ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे ते ठराविक समाजाचा विचार करून निर्णय घेण्याचे काम करत आहेत. बहुसंख्य लोकांना याची जाणीव नाही.
> जनगणनेत प्रत्येकाच्या जन्माची नोंद करण्याचा निर्णय होत आहे. जन्म झालेल्या गावाची देखील नोंद होईल असे पाहण्यात येत आहे. पण जो भटका समाज आहे त्याच्या जन्माची कोणती नोंद असेल का? त्याला भारतीय नागरिकत्व मिळेल का? नाहीतर त्याच्यावर अन्याय होणार आहे.
> समाजातील अनेक गोष्टींचा परिणाम सामाजिक न्याय विभागात असलेल्या घटकांना बसतो. यासाठी आपल्याला जागरूक राहावे लागेल. एक जबरदस्त संघटन उभारून ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्या पाठीशी उभे राहून, त्यांना न्याय मिळवून देण्याची व्यवस्था आपण करायला हवी.
> राज्यात तीन पक्षांची सत्ता आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे तीन भाग होतात. यातील आपल्याला मिळालेल्या एका भागाचे आपण चार भाग करत आहोत. एक सामाजिक न्याय विभागात काम करण्यासाठी, दुसरा अल्पभूधारकांसाठी, तिसरा महिलांसाठी, तर चौथा संघटनाचे काम करणाऱ्या इतर लोकांसाठी.
> मागासवर्गीयांसाठी अधिकारांचा योग्य वापर कसा करायचा याची नीती आपण ठरवू. यासाठी तुमच्या सर्वांची साथ मिळण्याची गरज आहे. राज्यातील सर्व समाज घटकांना योग्य न्याय कसा मिळेल, याची जबाबदारी राज्य सरकारची असेल व ती चोखपणे पार पाडण्यात येईल.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times