मुंबई मेट्रो-३ चे कारशेड कांजूरमार्गमध्ये उभारण्यासाठी १०२ एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी १ ऑक्टोबर रोजी काढलेल्या आदेशाला मुंबई हायकोर्टाची स्थगिती दिली आहे. त्या जमिनीवर कोणतेही काम करण्यास एमएमआरडीएला मनाई करण्यात आली आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनीही एक ट्विट करत या आदेशाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘न्यायालयाने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. पुढील वाटचाल ठरवण्यासाठी आम्ही न्यायालयाच्या आदेशाची लिखीत सविस्तर आदेशाची वाट पाहत आहोत. मेट्रो ३ सोबतच ६, ४ आणि १४ साठी ही जमीन महत्त्वाची आहे. यामुळं सरकारचे पाच हजार कोटी रुपये वाचणार आहेत तर, १ कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे,’ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
महाविकास आघाडी सरकारनं मेट्रो कारशेडसाठी आरे ऐवजी कांजूर येथील जागा निश्चित केली होती. मात्र, हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकला. केंद्र सरकारनं ही जामीन केंद्राच्या मालकीची असल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयानं जिल्हाधिकाऱ्यांच्या जमीन हस्तांतरणाच्या आदेशात त्रुटी असल्याचं नमूद केलं होतं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times