गोरेगाव येथील नेस्को मैदानावर मनसेच्या महाअधिवेशनाला संबोधित करताना राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी नवा झेंडा घेण्यामागची भूमिकाही स्पष्ट केली. २००६साली मनसेची स्थापना करतानाच माझ्या मनात हा झेंडा होता. संयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडाही भगवाच होता. संयुक्त महाराष्ट्र समिती विस्कटल्यानंतर पुढे शिवसेना जन्माला आली तेव्हा भगवा झेंडा घेतला गेला. माझ्या आजोबांनीच शिवसेनेला शिवसेना हे नाव दिलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाने शिवसेना वाढली. त्यात दुमत नाही. पण नव्या पक्षाची सुरुवात करताना जी माणसं सोबत लागतात तशी माणसं माझ्या पाठी नव्हती. मनसे स्थापन झाली तेव्हा मी अवघा ३७ वर्षाचा होतो. त्यावेळी माझ्या मनातही भगवा झेंडाच होता. पण अनेक लोक अनेक गोष्टी सूचवत होते. सोशल इंजीनियरिंग म्हणून मला हा झेंडा घ्यावा लागला. मला मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं म्हणून हा झेंडा घेतला. पण भगवा झेंडा मनातून आणि डोक्यातून काही जात नव्हता. सहा वर्षांपूर्वीच मी भगवा झेंडा पुन्हा बाहेर काढला. गेल्यावर्षभरापासून तर भगवा झेंड्याचाच विचार सुरू होता. म्हणून शेवटी आज अधिवेशनाच्या निमित्ताने हा झेंडा तुमच्या हातात दिला. कारण माझा मूळचा डीएनए हाच आहे, असं राज म्हणाले.
या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. हा इतर झेंड्यासारखा झेंडा नाही. हा झेंडा जेव्हा हातात घ्याल तेव्हा कुठेही वेडावाकडा पाडू नका. झेंड्यावरची राजमुद्रा ही आपली प्रेरणा आहे. हे लक्षात ठेवा. यापुढे आपले दोन झेंडे असतील. राजमुद्रा असलेला झेंडा निवडणुकीत वापरता येणार नाही. निवडणुकीत फक्त निशाणी असलेला झेंडा वापरायचा. राजमुद्रेचा मान राखला गेलाच पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
ऊर्जा देण्यासाठी बदल
झेंडा बदलणं ही काही नवीन गोष्ट नाही. पहिल्यांदाच असं काही घडतंय असंही नाही. १९८०मध्ये जनसंघानेही त्यांचा झेंडा आणि पक्षाचं नाव बदललं होतं. ही उदाहरणं आहेत. अनेकदा पक्ष वाढवताना, त्याचा विस्तार करताना कात टाकावी लागते. कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा द्यावी लागते, असंही ते म्हणाले.
उद्धव यांना टोला
यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. झेंड्याचा रंग बदलल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असं होत नाही. मी तोच आहे, जो पूर्वी होतो. माझी मतं तीच आहेत, जी पूर्वीपासून आहेत. रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times