कांजुरमार्ग येथे मेट्रो कार शेड उभारण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे व याबाबतची न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊन त्याचा फटका मुंबईकरांना बसू नये यासाठी मेट्रो ३ ची कार शेड वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर हलविण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे. त्यामुळं राज्य सरकारविरोधात भाजप पुन्हा एकदा आक्रम झाली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.
आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘मेट्रोला गिरगावमध्ये विरोध केला. मग समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, वाढवण बंदर इतकंच नव्हे तर मुंबई- दिल्ली कॉरिडॉर. प्रत्येक विकास प्रकल्पाला फक्त विरोध, विरोध आणि विरोधच. आता मेट्रो कारशेड उभारण्यापेक्षा या कारशेडला बीकेसीतील जागा देऊन बुलेट ट्रेन होऊच नये असा डाव आखला जातोय,’ असा आरोप शेलार यांनी केला आहे.
‘मुंबईकरांच्या प्रत्येक विकास प्रकल्पापेक्षा अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकाराच मोठा आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. शिवाय, वैयक्तिक अहंकारातून मुंबईच्या विकास प्रकल्पांचा गळा घोटला हे विरोधक नव्हे तर मुंबईच्या विकासातील गतिरोधक आहेत,’ असा आरोपही त्यांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times