बंगालच्या जनतेला आता राजकीय हिंसाचार, भ्रष्टाचार, बांगलादेशी घुसखोर, खंडणी, टोल लूटपासून स्वातंत्र्य हवे आहे. जनतेनं भाजपला फक्त एक संधी द्यावी आणि शोनार बांग्ला बनवू आणि पश्चिम बंगालला टागोर आणि सुभाषचंद्र बोस यांचे स्वप्न साकार करू, असं अमित शहा म्हणाले.
‘उसळलेली गर्दी ममता दीदींविरूद्ध रोषाचे प्रतीक’
अमित शहा यांनी २ किमीपर्यंत रोड शो केला. या रोड शोमधील समर्थकांना अमित शहांनी संबोधित केलं. रोड शोमध्ये उसळलेली ही गर्दी म्हणजे ममता सरकारविरोधात जनतेत असलेला रोष दर्शवते आणि विकासाच्या अजेंड्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील जनतेचा विश्वास दिसून येतो, असं शहा म्हणाले.
‘फक्त मुख्यमंत्री बदल नाही तर जनतेला राज्यात परिवर्तन हवंय’
अमित शहा यांनी यावेळी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आव्हान दिलं. ममता दीदी आता निवडणुकीच्या मैदानात उतरा. यावेळी निवडणुकीत कमळ फुलणार आहे. हे परिवर्तन मुख्यमंत्री बदलण्यासाठी नाही तर बंगालच्या विकासासाठी आहे, बंगालच्या प्रगतीसाठी आहे. हा बदल बंगालच्या विकासासाठी होईल. घुसखोरी रोखण्यासाठी बदल करण्यात येतील. राजकीय हिंसाचार संपवण्यासाठी बदल होईल. हे टोल लूच रोखण्यासाठी बदल असेल. भाच्याची दादागिरी संपवण्यासाठी बदल होईल, असा दावा अमित शहांनी केला.
सुभाषबाबूंच्या स्वप्नातील बंगाल बनवणारः अमित शाह
आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मत द्या. आम्ही बंगालला विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ. रविंद्रनाथ टागोर आणि सुभाषबाबूंच्या स्वप्नातील बंगाल बनवू. ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहेत तिथे ती राज्य विकासाच्या मार्गावर आहेत. पण पश्चिम बंगाल विकासाच्या मार्गावरून भरकटले आहे, असं अमित शहा म्हणाले.
तुम्ही कॉंग्रेसला ३० वर्षे सत्तेची चावी दिली. २७ वर्षे कम्युनिस्टांनी राज्य केलं. ममता दीदींनी १० वर्षे राज्य केलं. पण काय विकास झाला? पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक संधी द्या. आम्ही पाच वर्षांत शोनर बांगला बनवू. तृणमूल कॉंग्रेसला मुळासकट उपटून काढण्याची संधी तुमच्याकडे आहे, असं अवाहन अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला केलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times