मुंबईतील कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणात तुम्हाला श्रेय हवे असल्यास खुशाल घ्या, पण हा माझ्या आणि तुमच्या अंहकाराचा प्रश्न नाही. प्रकल्प अडवण्याचा कद्रूपणा सोडून चर्चा करुन मार्ग काढू या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी भाजपला केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या अवाहनानंतर चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन पंतप्रधानांना भेटण्याचा सल्ला दिला आहे. तसंच, टीम इंडिया असं समजून काम करा, असंही म्हटलं आहे. ‘आरे कारशेडच्या प्रश्नांवर उद्धवजी यांच्या वक्तव्याचे भारतीय जनता पार्टी स्वागत करेत. पण मी राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, या प्रकल्पाचे ८० टक्के काम आमच्या सरकारच्या कार्यकाळात झाले आहे. तुम्ही सुरूवातीपासूनच याला इगोचा विषय बनविला, जर तुमच्या उपाययोजना वेगळ्या आणि मुंबईच्या हितासाठी असत्या आणि त्यासाठी तुम्हाला केंद्राची जागा हवी होती, तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने पंतप्रधानांकडे निवेदन दिले असते. तुमच्याकडे प्रारंभी वेळ होता की, तुम्ही देवेंद्रजींना सोबत घेऊन सर्व तज्ज्ञांच्या अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेऊ शकला असता,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
‘पण आजही मेट्रो कारशेडवर तुमचे सर्व निवेदन अपूर्ण आहे. ते जनतेला भ्रमात पाडणारे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन मोदीजी आणि केंद्राच्या इतर विभागातील मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढून मुंबईच्या हिताचा निर्णय घेऊ शकता. एक जनप्रतिनिधी आणि सर्वप्रथम महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून हाच माझा तुम्हाला सल्ला आहे,” असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times