सिडनी, : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांसाठी भारताचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने अजिंक्यला एक सल्ला दिला आहे. फक्त ही एकच गोष्ट अजिंक्यला करायला सांगितली आहे.

भारताचा माजी सलामीवीर आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीरने अजिंक्यला एक सल्ला दिला आहे. गंभीर यावेळी म्हणाला की, ” एक महत्वाची गोष्ट अजिंक्यने कर्णधार झाल्यावर करायला हवी. ती गोष्ट म्हणजे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने चौथ्या क्रमांकावर खेळायला यायला हवे. संघात जर लोकेश राहुल किंवा शुभमन गिल यांना संधी दिली तर त्यांना पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करायला पाठवायला हवे. फलंदाजीमध्ये चौथे स्थान हे फार महत्वाचे असते. त्यामुळे या क्रमांकावर अजिंक्य फलंदाजीला आला तर एक सकारात्मक गोष्ट पाहायला मिळेल आणि त्याचा चांगला फायदा संघाला होईल.”

भारतीय संघाने किती गोलंदाज खेळवावे…
भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात किती गोलंदाज खेळवायला हवे, याबाबतही गंभीरने एक सल्ला दिला आहे. गंभीर म्हणाला की, ” पुढच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पाच गोलंदाजांसह उतरायला हवे. त्यामध्ये आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यासारखे दोन अनुभवी फिरकीपटू असायला हवेत आणि त्याचबरोबर तीन वेगवान गोलंदाजांना संधी द्यायला हवी. जर अशी रचना संघात करण्यात आली तर नक्कीच चांगला समतोल पाहायला मिळू शकतो.”

भारताची फलंदाजी कशी बळकट होऊ शकते…भारताची फलंदाजी अधिक बळकट कशी होऊ शकते, याबाबतही गंभीरने आपले मत व्यक्त केले आहे. गंभीर म्हणाला की, ” जडेजाला या सामन्यात संधी द्यायला हवी, असे मला वाटते. कारण जडेजा सातव्या क्रमांकावर येऊन चांगली फलंदाजी करू शकतो. त्याचबरोबर अश्विन आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. म्हणजे भारतीय संघ सहा फलंदाजांनिशी या सामन्यात उतरू शकतो आणि आठव्या क्रमांकापर्यंत भारतीय संघाची फलंदाजी पाहायला मिळू शकते. त्यामुळे हे बदल जर संघात झाले तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here